टाळ, मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष करत ठाण्यातील रघुनाथनगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडीद्वारे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश दिला. आषाढी एकादशीनिमित्त पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, यात विद्यार्थी तसेच शिक्षकही सहभागी झाले होते. रघुनाथनगर येथील शाळेच्या इमारतीतून दिंडीला प्रारंभ झाला.
प्रारंभी शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रदिप ढवळ, नगरसेविका नम्रता फाटक, माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या हस्ते पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. संस्थेच्या विश्वस्त डॉ. हर्षला लिखिते, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर, उपमुख्याध्यापिका दिपीका तलाठी, प्रा.सचिन आंबेगावकर, प्रा. विनायक जोशी, लक्ष्मी रामचंद्रन आदी यावेळी उपस्थित होते. हरिनामाचा तसेच टाळ-मृदुंगाचा गजर करीत निघालेला ही दिंडी सोहळा रघुनाथनगर येथून रायलादेवी तलाव परिसर, मुलुंड चेकनाका, रहेजा येथून पुन्हा शाळेच्या ठिकाणी आल्यावर समारोप झाला.या दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. एनसीसी, एनएसएस, रोटरॅक्ट क्लब आदींचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.