राज्य भरातील ऑटोरिक्षा चालक-मालक आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीने येत्या रविवारी ९ जून रोजी राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आपल्या विविध मागण्या राज्य सरकारकडून मान्य करुन घेण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. परिणामी, येत्या काही दिवसात राज्यातील ऑटोची वाहतुक विस्कळित होण्याची दाट शक्यता आहे.
काय आहेत मागण्या?
- ऑटोरिक्षा चालक-मालकांसाठी राज्य शासनाने कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. हे महामंडळ परिवहन विभागा अर्तंगत असावे.
- विमा कंपनीत भरले जाणारे पैसे विमा कंपनीस न भरता कल्याणकारी महामंडळात भरावेत आणि त्याद्वारे आटोरिक्षाचालक-मालकांना पेन्शन, ग्रज्युईटी, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय मदत देण्यात यावी.
- प्रत्येक जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात यावी.
- हकिम कमिटीच्या शिफारशीनुसार ऑटोरिक्षाचे भाडे तातडीने वाढविण्यात यावे.
- ओला-उबेर सारख्या अवैध टॅक्सी कंपन्याची सेवा त्वरीत बंद करण्यात यावी.
या प्रमुख मागण्यासाठी रविवारी राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात मागण्यांवर चर्चा होणार आहे. राज्य सरकारने या मागण्या लवकरात-लवकर मान्य केल्या नाहीत तर पुढील आंदोलनाची दिशा देखील ठरविण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले आहे.