उंदीर, चहा, चिक्की खूप झाली महाराष्ट्राची नाचक्की! आता सुशासन पाहिजे… असं म्हणत काँग्रेस पक्षाने निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. आगमी लोकसभा आणि विधानसभेसाठी राज्यासह देशामध्ये सर्वच पक्ष कामाला लागले असून, काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जणू कंबरच कसल्याचे पहायला मिळत आहे. एरवी भाषणातून भाजपवर जोरदार टीका करणाऱ्या काँग्रेसने आता गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. काँग्रेसने तयार केलेले हे थिम साँग आता सोशल मीडियावर देखील फिरू लागले आहे. मात्र हे थिम साँग काँग्रेसचा जनसंघर्ष जनतेपर्यंत घेऊन जाईल का? हे पाहावे लागेल.
काय आहेत गाण्याचे बोल
नुसत्या आश्वासनांचा रे लावून तडका,
अन् महागाईचा रे उडवला भडका,
नुसती भाषणबाजी करून अशी,
जनतेची दिशाभूल केली कशी,
महागाई पडली उरी,
जनतेची दिशाभूल केली कशी,
जनतेच्या हो कल्याणासाठी काँग्रेसची सत्ता बरी…
विश्वासाची पंरपरा ही हाताची साथ बरी…
काँग्रेसची सत्ता बरी…
आजपासून काँग्रेसची जनसंघर्षयात्रा
जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचता यावे यासाठी काँग्रेसकडून जन संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, आज कोल्हापूर येथून काँग्रेसच्या ही यात्रा सुरू झाली आहे. यात्रेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मलिक्कार्जून खर्गे आणि काँग्रेसचे इतर ज्येष्ठ मंत्री उपस्थित आहेत. या यात्रे दरम्यान भाजपाने कशी जनतेची दिशाभूल केली हे लोकांपर्यंत काँग्रेस पोहोचवणार आहेत.
मराठ्यांना आमचा थेट पांठिंबा
आज मराठा समाजाचा जो संयम सुटला आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी करत आम्ही या यात्रेतून तुम्हाला शाब्दिक पाठिंबा नाही तर थेट पांठिंबा देत आहोत असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले
वाचा – आता काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा; पहिला टप्पा ३१ ऑगस्टला