मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (सीएसएमटी) इमारत हे मुंबईत येणार्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. युनेस्कोने या इमारतीचा समावेश जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत केलेला आहे. पण पुरातत्व विभागाच्या उदासिनतेमुळे इमारतीची दुरुस्ती होत नव्हती. आता पुरातत्व विभागाने अनुमती दिल्यामुळे प्रशासनाने तसा निर्णय घेतला असून त्यासाठी ५ कोटी ३४ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.
जागतिक प्रसिद्धी मिळवलेल्या या इमारतीच्या बाह्य भागाची दुरुस्ती करण्यास पुरातत्व विभागाने संमती दिली होती. यापूर्वी दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी दुरुस्तीचा विचार करण्यात आला होता, पण पुरातत्व विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी रेल्वेने हेरिटेज एक्सपर्टना निमंत्रित केले आहे.
सध्या इमारतीच्या उत्तरेकडील भागाच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या दुरुस्तीसाठी पाच कोटी ३४ लाख 42 हजार इतका खर्च रेल्वेकडून करण्यात येणार आहे. या दुरुस्तीसाठी ९ महिन्याचा काळ निश्चित करण्यात आला आहे. इमारतीचे उर्वरित काम टप्याटप्याने पूर्ण केले जाणार आहे. १३० वर्षांनंतरही या इमारतीचा दिमाख कायम आहे. तिला दक्षिण मुंबईची शान मानली जाते. ही इमारत म्हणजे वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना आहे.
सर्वोत्कृष्ट सेल्फी पॉईन्ट
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची मुख्य इमारत म्हणजे ब्रिटिश, इटालियन तसेच भारतीय संस्कृतीचा उत्तम मिलाफ आहे. १८७८ मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरीक विल्यम स्टीव्हन यांनी हे रेल्वे कंपनीचे मुख्यालय बांधण्यास सुरुवात केली होती. २० मे १८८८ मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली. त्याकाळी ही इमारत बांधण्यासाठी १६.१४ लाख रुपये खर्च आला होता. १८८७ मध्ये लंडनची राणी व्हिक्टोरिया हिच्या नावाने व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव ठेवण्यात आले. १९९६ मध्ये राज्य विधिमंडळात या इमारतीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात यावे, असा ठराव करण्यात आला. संसदेने त्याला संमती दिली. मुंबईत येणार्या प्रत्येक पर्यटकाला ही इमारत आतून आणि बाहेरून पाहण्याचा मोह आवरत नाही. आकर्षक वास्तूकलेमुळे ही इमारत प्रवासी आणि पर्यटकांसाठी सेल्फी पॉईन्ट बनला आहे.