गणेशोत्सवात निर्माण होणारे हार, फुलांचे निर्माल्य आणि इतर कचरा याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन व्हावे, यासाठी अंबरनाथ नगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ आणि औंबाविकास भावसार व्हिझन यांच्या संयुक्त विद्यमाने विसर्जन ठिकाणी निर्माल संकलन, विलगीकरण आणि प्रक्रिया केली जाणार आहे. विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, रोटरीचे सदस्य आणि पालिकेचे सफाई कर्मचारी सहभागी होणार असून त्यातून निर्माण होणारे खत मागणीनुसार वाटप केले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानात घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले जात असले तरी धार्मिकतेच्या नावाखाला आजही बहुतांश नागरिक निर्माल्य जलस्त्रोतात टाकताना दिसत आहेत.
निर्माल्यामुळे जलसाठे प्रदुषित होत आहेत. यावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून विसर्जन ठिकाणी निर्माल्य संकलन, विलगीकरणी आणि प्रक्रिया केली जाते आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रयोगातून दिड टन, तर गेल्या वर्षात चार टन खत निर्मिती करण्यात यश आले होते. यात यश मिळाल्याने यंदा हाच प्रयोग पुन्हा एकदा संपूर्ण शहरासाठी राबवण्यात येणार आहे. रोटरी अंबरनाथ नगरपालिका, क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ आणि विकास भावसार विझन यांच्यावतीने हा उपक्रम पुन्हा एकदा राबवला जाणार आहे.
अंबरनाथ शहरातील चिंचपाडा येथील खदान, जावसई येथील धरण आणि कैलास नगर येथील गणेश घाटावर निर्माल्य संकलित केले जाणार आहे. या निर्माल्याच्या जागच्या जागी संकलन केले जाणार आहे. पुढे हेच निर्माल्य अंबरनाथ पूर्वेतील वडवली येथील वेल्फेअर सेंटर येथे नेऊन त्याचे कम्पोस्ट आणि गांडूळ खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. यासाठी ठाणे आणि आसपासच्या शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार असून रोटरी सदस्य आणि अंबरनाथ नगरपालिकेचे सफाई कामगारांच्या जोडीला ते या उपक्रमात सहभागी होतील, अशी माहिती प्रकल्प अधिकारी राजेश भावसार यांनी दिली आहे. निर्माल्यावर प्रक्रिया करत असताना त्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे नागरिकांनी भावनेच्या पलिकडे जाऊन निर्माल्य प्रक्रियेचा विचार करावा, असे आवाहनही भावसार यांनी केले आहे.
हेही वाचा –
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान