किरीट सोमय्या हे गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आज एक व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप केल्याची बाजू मांडली. दरम्यान किरीट सोमय्यांच्या मुलुंड येथील घर आणि कार्यालयाच्या ठिकाणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेची टीम दाखल झाली आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्यांना ईओडब्ल्यूने समन्स बजावला आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे किरीट सोमय्या यांना १३ एप्रिल बुधवारपर्यंत हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूने हा समन्स बजावला आहे. किरीट सोमय्या नॉट रिचेबल असल्यानेच ईओडब्ल्यूने हा समन्स बजावला आहे. याआधीच राज्याच्या गृहमंत्र्यांनी केंद्राकडे किरीट सोमय्यांबाबतची विचारण करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी बचाव मोहिमेअंतर्गत किरीट सोमय्यांनी पुढाकार घेत निधी जमा केला होता. अनेक मुंबईकरांनी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांनीही या निधीसाठी रक्कम दान केली होती. पण ही रक्कम राजभवन कार्यालयाकडे जमा न झाल्याची बाब शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उघडकीस आणली होती. त्यानंतर निधी जमा करून तो जमा न केल्याच्या विरोधातच या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारावरच मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने आज या प्रकरणात किरीट सोमय्या यांचे मुलुंड येथील राहते निवासस्थान तसेच कार्यालय येथे चौकशीला हजर राहण्यासाठीचा समन्स बजावला. या प्रकरणात बुधवार १२ एप्रिलपर्यंत हजर राहण्यासाठीचा समन्स किरीट सोमय्यांना बजावण्यात आला आहे.
याआधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही किरीट सोमय्या सध्या नॉटरिचेबल आहेत याबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावेळी गृहमंत्री म्हणाले की, तुमचे झेड सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत असे केंद्राला विचारू. आरोप करणं सोपं असतं आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही, असा जोरदार टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांना लगावला.
सोमय्या नॉट रिचेबल! केंद्राला विचारु तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत? – गृहमंत्री