मुंबई : भाजपाच्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA चे वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्यामुळे आता साध्वींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु, महत्त्वाची बाब म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट कापत त्यांच्या जागी आलोक शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याच कारणास्तव भाजपा पक्षश्रेष्ठींनी साध्वी प्रज्ञा सिंहचे तिकीट तर नाही कापले ना? अशा चर्चांना उधाण आले आहे. (NIA warrant for Sadhvi Pragya Singh Thakur in Malegaon blast case)
हेही वाचा… G. N. Saibaba : सुप्रीम कोर्टही म्हणते जीएन साईबाबा निर्दोष, राज्य सरकारला दणका
मुंबईतील राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या विशेष न्यायालयाने (NIA) साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. साध्वी प्रज्ञा या मालेगावर बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला न्यायालयात गैरहजर होत्या. त्यामुळे NIA न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना वॉरंट बजावले आहे. 10 हजार रुपयांच्या या जामीनपात्र वॉरंटची येत्या 20 मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. साध्वी प्रज्ञा या अंतिम जबाब नोंदणी प्रक्रियेला गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागण्यास विलंब होत असल्याची तक्रार इतर आरोपींनी केली आहे. त्याची दखल घेत विशेष न्यायालायने साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले असल्याची माहिती समोर आली आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले होते. तर महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांचे तिकिट कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या होत्या की, हा पक्षसंघटनेचा निर्णय आहे. पक्षाने उमेदवारी का दिली नाही आणि कशामुळे देण्यात आली नाही? याचा विचार करायचा नाही. मी 2019 मध्येही उमेदवारी मागितली नव्हती आणि आतादेखील मागितलेली नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते.
तर, साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत जे वक्तव्य केले होते, त्याबाबत मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रसंगाबाबत सांगताना साध्वी म्हणाल्या की, मी ज्या शब्दांचा वापर केला ते शब्द पीएम मोदींना आवडले नसतील, असे असू शकते. ते म्हणाले होते मला माफ करणार नाही. मात्र, मी त्यांची माफी मागितली होती. माझे खरे बोलणे विरोधकांना आणि काँग्रेसला आवडत नाही. मी काही बोलले की, त्याच्या फायदा ते मोदींविरोधात बोलण्यासाठी करतात, असे मत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यक्त केले होते.