मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. पण सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण दुसऱ्या बाजूला मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख सध्या तरी मुंबईत लॉकडाऊन होणार नाही असं म्हणत आहेत. तसेच मुंबईत आणखी किती कडक नियम लावायचे?, असं देखील अस्लम शेख म्हणाले.
नक्की काय म्हणाले अस्लम शेख?
अस्लम शेख म्हणाले की, ‘आपण मुंबईत आधीही दुकाने ऑड-ईवनची पद्धतीने सुरू ठेवायचे हे केले होते. आता नियम लावायचे तर किती कठोर नियम लावायचे? आधीच मॉल्समध्ये जे पूर्वी १०० लोकं जात होती, तिथे आता फक्त ३० लोकांना जाण्यास परवानगी दिली आहे. तसेच आपण मॉल्समध्ये जाताना टेस्टिंग करणे अनिवार्य केले आहे. मॉल्समधील लोकांची संख्या आधीच कमी झाली आहे. बार आणि रेस्टॉरंट मालक लाखो रुपयांचा खर्च करत आहेत. जर परत बार आणि रेस्टॉरंट बंद केलं तर ते कुठून हा खर्च करतील. याचा मंत्रिमंडळ जास्त विचार करत आहे. तर काँग्रेस पक्ष लॉकडाऊन होऊन नये, यासाठी सकारात्मक आहे. कारण जर लॉकडाऊनची परिस्थिती आली तर त्यांना पैसे द्यावे लागतील. त्यांच्यासाठी एखादा पर्याय काढावा लागेल. मुंबईत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहे. कारण मुंबईत अनेक स्थलांतरित कामगार आहे. त्यांच्यासाठी राहण्यासाठी हॉटेल्स आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आज बैठक होणार आहे. लोकांनी जर सरकारला साथ दिली नाहीतर करायचं काय? ही परिस्थिती निर्माण झाली आहे.’
मुंबईतील कोरोनाची स्थिती
दिनांक नव्या कोरोनाबाधितांची संख्या
२८ मार्च ६ हजार ९२३
२९ मार्च ५ हजार ८८८
३० मार्च ४ हजार ७५८
३१ मार्च ५ हजार ३९४
१ एप्रिल ८ हजार ६४६