आणीबाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विरोध करण्यासाठी भाजपतर्फे आज काळा दिवस साजरा करण्यात आला. काँग्रेसकडून या कृतीचा निषेध होणे स्वाभाविक होतेच. मात्र मनेसेनेही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगचित्राच्यामाध्यमातून टीका केली आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, उद्योगपती, प्रसारमाध्यमे यांची गळचेपी करत असल्याचे त्यांनी आपल्या व्यंगचित्रामध्ये दाखवले आहे.
नेमकं काय आहे व्यंगचित्रामध्ये
लोका सांगे…! असे हेडिंग या व्यंगचित्राला देण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, उद्योगपती, प्रसारमाध्यमे यांच्यावर पाय देऊन उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच या सर्वांची गळचेपी केल्यानंतर मात्र हे मोदी इंदिरा गांधी ह्या हिटलर वृत्तीच्या होत्या. त्यांनी देशात आणीबाणी लादली. विचार आणि वाणीस्वातंत्र्याच्या मुसक्या आवळल्या. आणीबाणी ही एक भयानक गोष्ट आहे, असे सांगत सुटल्याचा टोला लगावला आहे.
#IndiraGandhi #Emergency #EmergencyPart2 #NarendraModi #FreedomOfSpeech #media #electioncommissionofindia #Reservebankofindia #businesshouses pic.twitter.com/2aw6duX54J
— Raj Thackeray (@RajThackeray) June 26, 2018
१९७५ साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला आज ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा देण्यासाठी सत्ताधारी भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील कार्यक्रमात सहभागी होऊन आणीबाणीवरून काँग्रेसला लक्ष्य केले.