‘होय मी लाभार्थी’ या मोहीमेअंतर्गत सरकारकडून स्वत:च्या कामाचा प्रचार केला जात होता. या प्रचाराबद्दल राज ठाकरेंनी पुराव्यानिशी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. शनिवारी शिवाजी पार्क येथे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरेंनी एक व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ विदर्भातील हरिसाल या गावाचा होता. दोन वर्षांपुर्वी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील हरिसाल हे गाव देशातील पहिलं डिझीटल गाव झाल्याचं घोषित केलं होतं. याच गावाचा ग्राउंड रिपोर्ट मनसेने घेतला आणि गावाच्या वास्तविकतेचे दृश्य राज ठाकरेंनी व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर दाखवून दिले.
नेमकं काय होतं व्हिडिओमध्ये?
राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान दाखवलेल्या व्हिडिओमध्ये हरिसाल गावाचा एक व्हिडिओ होता. हे गाव देशातील पहिलं डिझीटल गाव असल्याचा दावा भाजप सरकार करत होते. परंतु, जेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी या गावाला भेट दिली तेव्हा या गावाचे खरे रुप बाहेर आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गावातील लोकांकडे एटीएम कार्ड देखील नाही. यासोबतच गावाच्या शाळेतील आर्ध्या विद्यार्थ्यांना डिझीटलच्या नावाने लॅपटॉप मिळाले आहेत, तर काहींना नाही. काही कम्प्युटरमशीन खराब असल्याचे निदर्शनास आले. यासोबतच तेथील शिक्षकांच्याही व्यथा या व्हिडिओमध्ये दर्शवण्यात आल्या आहेत. याच मुद्यावरुन राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.