घरमुंबईव्यापक हेतू असणारे साहित्य टिकते-प्रेमानंद गज्वी

व्यापक हेतू असणारे साहित्य टिकते-प्रेमानंद गज्वी

Subscribe

केवळ मनोरंजन हा साहित्य निर्मितीचा मूळ हेतू नसतो. व्यापक प्रबोधन वा लोकशिक्षण आणि भाषा वैभव संवर्धन असा व्यापक विचार साहित्य निर्मितीच्या मुळाशी असतो. असा व्यापक किंवा वैश्विक हेतू असणारे साहित्य टिकते. शिवाय हा हेतू लेखकांची प्रतिभा सतत जागी ठेवतो. यातूनच प्रतिभावंत साहित्यिक घडतात. भाषेचे सौष्ठव कायम राहते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी विरार येथे पार पडलेल्या 19 व्या साहित्य जल्लोषच्या उद्घाटनात बोलताना केले.

विरार येथील वि.वा. महाविद्यालयात गज्वी यांच्या हस्ते 19 व्या साहित्य जल्लोषचे उद्घाटन झाले. यावेळी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अँड्र्यू कोलासो, वि.वा. महाविद्यालयाचे पदाधिकारी संजीव पाटील यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संमेलनाला शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्यात जल्लोष प्रतिष्ठानचे पदाधिकारी संदेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कवयित्री डॉ. पल्लवी बनसोडे यांनी केले. ज्येष्ठ पुस्तक प्रकाशक व जल्लोष प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अशोक मुळ्ये, वि.वा.महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राजक्ता परांजपे, सचिव अपर्णा ठाकूर, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती प्रशांत राऊत यावेळी व्यासपीठावर होते.

- Advertisement -

साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे नवनियुक्त अध्यक्ष अँड्र्यू कोलासो यांचा फादर फ्रांसिस दिब्रिटो यांच्या हस्ते सोहळ्यात सत्कार करण्यात आला. आपण जन्माने मराठी आणि कर्माने इंग्रजी झालो आहोत. हा काळाचा प्रभाव आहे. मात्र, इंग्रजी भाषेत जे जे उत्तम आहे, ते मराठीत आले पाहिजे आणि इंग्रजी ही एकमेव परदेशी भाषा नाही. आता जर्मन, फ्रेंच, रशियन भाषा सुद्धा आपण शिकल्या पाहिजेत. त्या भाषांमधील कसदार साहित्य मराठीत आले पाहिजे. यामुळे मराठीचे नुकसान होणार नाही, तर मराठी भाषा अधिक सम्रुद्ध व वैश्विक होईल, असा विश्वासही गज्वी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

राज्यात वर्षाला किमान 200 साहित्य संमेलने भरतात. एक हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित होतात. मात्र, पुस्तके विकली जात नाहीत. आता लग्न कार्य, वाढदिवस, निरोप समारंभात पुस्तके भेट दिली जावीत. श्रद्धेने झाडांना बांधलेले दोरे तुम्ही आता कापून टाका आणि झाडांना मोकळा श्वास घेऊ द्या. कारण ती झाडेच आपल्याला प्राणवायू देतात. सध्या राजधानी दिल्लीचे वातावरण या संदर्भात खूप बोलके असल्याचेही गज्वी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

- Advertisement -

आपल्या भाषणात प्रेमानंद गज्वी यांनी अजूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही ही खंत व्यक्त केली. वसईचे हे जल्लोष साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीचे आहे आणि राजाश्रया शिवाय असे मोठे उपक्रम राबवणे अवघड असते. हे समजून राजकारणाचे वावडे न मानता त्यांना बरोबर घेऊन येथे दर्जेदार संमेलन होत आहे. याचा विशेष आनंद आपल्याला मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्ममुक्तीची गरज कधीची परखडपणे सांगितली आहे. पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत स्त्री मुक्ती नव्हे तर पुरुष मुक्ती व्हावी. जगातील सर्व वाद वा संघर्ष हे स्त्रियांमुळे नाही तर पुरुषी अहंकार व सदोष मानसिकतेतून निर्माण झाले आहेत. अंतराळात झेपावताना डॉ. कल्पना चावला यांना समाजाने पंख दिले आहेत, तर असंख्य महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून महिला कुठेही मागे नसतात याचे कायमस्वरूपी उदाहरण घालून दिले आहे, असे 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रांसिस दिब्रिटो यांनी आपले विचार मांडताना सांगितले.

महापौर प्रविण शेट्टी यांनी जल्लोष उपक्रमाचे कौतुक करताना मराठी भाषेचा हा जागर सशक्त समाजव्यवस्थेसाठी आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. महापालिका अशा चळवळीला बळ देत राहील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या उद्घाटन सोहळ्यात फा. मायकल, अजीव पाटील, संजय पिंगुळकर, डॉ. भारती देशमुख, संगीतकार राहुल रानडे, दत्तात्रय देशमुख, प्रकाश वनमाळी, हरिभाऊ म्हात्रे सहभागी झाले होते.संमेलनात कवयित्री समेधा वाळिंजकर यांच्या हसरी वेदना या कथासंग्रहाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -