घरमुंबईउद्धव ठाकरे पंतप्रधान होणार

उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार

Subscribe

संजय राऊत यांचा दावा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपवर जोरदार टीका केली कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे, असा चिमटा काढतानाच आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका करतानाच आगामी काळात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेतही दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत असतात. टीका करणार्‍या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. भाजपमधील काही लोकांना पीएचडी तर काहींना डीलिट दिली पाहिजे, असा टोमणाही त्यांनी लगावला. त्यांना लोकं मारायची आहेत. मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मोदींचे दौरे आणि राऊतांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले कित्येक महिने परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे परदेशात कोरोनाची काय स्थिती आहे हे भाजपवाल्यांना कळणार नाही. जरा परदेशात काय चाललं ते पाहा. ब्रिटनमधून होणारी विमानसेवा 42 देशांनी बंद केली आहे. कशासाठी केली आहे? काही कळतं का भाजपला? असा सवालही त्यांनी केला.

इतके हतबल सरकार पाहिले नाही
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार हतबल झाले आहे. गेल्या 50 वर्षांत इतकं हतबल सरकार कधीही दिसले नाही, असा हल्ला चढवतानाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र, हे आंदोलन राजकारणविरहीत असल्यामुळे शिवसेना या आंदोलनात सहभागी होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना भवन
अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत. तीन पक्ष एकत्र आल्याने आगामी काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत आहे. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवसेना भवन असेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -