मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर लावलेल्या कलमांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कलमे न्यायालयात टिकणार नाहीत, असा दावा कायदेतज्ञ करत आहेत. तर ही कलमेच राजकीय द्वेषापोटी लावण्यात आल्याचा आरोप राजकीय नेते करत आहेत.
मात्र पोलिसांनी चुकीची कलमे लावल्याची ही काही पहिली वेळ नाही. गुन्ह्याचा आशय समजून न घेता पोलिसांनी कलमे लावली आहेत व त्याचा फटका र्निदोष आरोपींनी बसला आहे. काही प्रकरणात तर उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारल्याचीही उदाहरणे आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतयात्रेच्या दिवशी मुंबई बंद होती. पालघर येथील शाहिन धादा व रेनू श्रीनिवास यांनी मुंबई बंद का?, अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती. या दोघींविरोधात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्याची दखल घेत पोलिसांनी या दोघींना तत्काळ अटक केली. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांची चांगलीच कानउडणी केली. ही अटक बेकायदा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोघींविरोधातील गुन्हे रद्द केल्याचा अहवाल पालघर न्यायालयात सादर केला. त्या दोघींची आरोपातून मुक्तता झाली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या रॅलीचे सप्टेंबर २०१२ मध्ये मुंबईत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्टुनीस्ट असीम त्रिवेदीने आक्षेपार्ह चित्रे काढली होती. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यावरुनही वाद निर्माण झाला होता. त्यावेळच्या काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारवर व पोलिसांवर टीका झाली होती. न्यायालयानेही पोलिसांवर ताशेरे ओढले होते. अखेर तेव्हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी असीम त्रिवेदीविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा रद्द करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. तसेच देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याबाबत नियमावली तयार करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते.
बिहार न्यायालयाने नुकतीच एका आरोपीची बलात्काराच्या आरोपातून सुटका केली. आरोपीने घरात घुसुन बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता. मात्र घरात घुसून बलात्कार करणे एवढ्या सहज घटना घडत नाही. पीडित महिलेने काहीच प्रतिकार केला नाही का?, आरडाओरडा केला नाही का?, असा सवाल न्यायालयाने केला. तसेच पोलीस तपासावरही न्यायालयाने ताशेरे ओढले. कारण पीडित महिलेच्या कुटुंबाचे व आरोपीचा वाद असल्याचेही समाेर आले होते. त्यादृष्टीने तपास होणे अपेक्षित होते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे पोलिसांवर व शिंदे- फडणवीस सरकारवर टीका सुरु झाली. शाई फेकणाऱ्या आरोपीची बाजू मांडणाऱ्या वकीलांनीही ही कलमे या गुन्ह्यात लागूच होत नसल्याचा दावा केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही शाईफेक करण्यात आली होती. त्यांच्यांवर शाईफेक करणाऱ्या आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. मग चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्याविरोधात हा गुन्हा का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक म्हणजे हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा होतो की नाही यावर न्यायालय काय निर्णय देणार हे बघावे लागेल.
तसेच फुले, आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली. काँग्रेस कार्यकर्ते संदीप कुदळे यांनी याचा निषेध केला. पोलिसांनी कुदळे यांना अटक केली. याचा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निषेध केला. संदीप कुदळे याने नोंदवलेला निषेध गुन्हा कसा होता, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ही अटकही न्यायालयात टिकणार नाही, असे कायदेतज्ञांचे मत आहे.