भाईंदर :- भाईंदर ते वसई रो-रो जलवाहतूक सेवा आज(20 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. सागरमाला योजने अंतर्गत २०१६ साली या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.परंतु, पर्यावरण परवानगीसाठी वेळ लागत होता.परवानगी नंतर त्याची निविदा प्रक्रिया होऊन कामकाज झाले होते. त्यानुसार भाईंदर ते वसई दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे करण्यात आली होती.त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली रो-रो सेवेला मुहूर्त मिळाला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वसई खाडीमध्ये भाईंदर ते वसई दरम्यान सध्या “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरु करण्यात येणार आहे. या फेरीबोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी व बोटीमधून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढ-उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर, या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या या रो-रो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत.
मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीस ही रो-रो फेरीबोट सेवा चालवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली आहे. या कंपनीला कोकण किनारपट्टीवर राजपुरी, बाणकोट, दाभोळ आणि जयगड या खाड्यांमध्ये रो-रो फेरीबोट सेवा चालविण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. वसई ते भाईंदर या फेरीबोट सेवेसाठी सध्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. खासदार राजन विचारे यांनी अनेक वर्षांपासून या रो-रो सेवेबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.
रो-रो सेवेची वैशिष्टये
एकाच फेरीत १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची क्षमता
भाईंदर व वसई या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर सुमारे ३४ किलोमीटरने कमी होणार
तिकीट दर
मोटारसायकल (चालकासह) रु. ६०/-
रिकामी तीन चाकी रिक्षा मिनीडोर (चालकासह – रु. १००/-
चारचाकी वाहन (कार) (चालकासह) – रु. १८०/-
मासे, पक्षी, कोंबडी, फळे इ. (प्रति टोपली) व कुत्रा, शेळी, मेंढी (प्रति नग) – रु. ४०/-
प्रवासी प्रौढ (१२ वर्षांवरील) – रु. ३०/-
प्रवासी लहान (३ ते १२ वर्षांपर्यंत) – रु. १५/-