पालघर: गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या जोरदार पावसाने वसई, विरार, मीरा भाईंदर शहराला चांगलेच झोडपून काढले. तसेच पालघर जिल्ह्यातील बर्याच भागात जोरदार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचून राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच पाऊस सतत कोसळला. गुरुवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार बरसणार्या पावसाने वसई, विरारसह मीरा भाईंदर शहरातील अनेक भागात पाणी साचून राहिले होते. वसई विरार परिसरात विरार पश्चिमेकडील भागात मुख्य रस्त्यावरच पाणी साचून राहिले होते. तर नालासोपारा शहरातील तुळींज, आचोळे रोड, सेंट्रल पार्क परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ससूनवघरपासून वरसोवा खाडीपूलापर्यंत पाणी साचून राहिल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले नसल्याने गेल्या तीन-चार वर्षांपासून हायवेवर वसईच्या हद्दीत डोंगरावरून पाणी मोठ्या प्रमाणावर येऊन तुंबून रहात असल्याने अक्षरशः पूरसदृश्य स्थिती पहावयास मिळते. शुक्रवारी तिच परिस्थिती पुन्हा उद्भवल्याने हायवेवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती. मीरा भाईंदर शहरातील भाईंदरच्या बेकरी गल्ली व मिरारोडच्या गीता नगर फेस -६, शांतीनगर, शितलनगर, हटकेश, काशीमिरा भागातील गावठाण, मुंशी कंपाउंड, कृष्ण स्थळ, वेस्टर्न पार्क, ग्रीन व्हिलेज याठिकाणच्या सखल भागात पाणी भरले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.