माणगाव: तालुक्यातील मुंबई -गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून लोणेरे विभागातील रेपोली गावच्या हद्दीत १९ जानेवारीची पहाट होण्यापूर्वीच ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास मन हेलावून करून टाकणारा विचित्र अपघात घडला. इको कारला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात जखमी झालेल्या ३ ते ४ वर्षाच्या चिमुकल्याचा काही तासांतच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून अवघे वातावरण शोकमय झाले आहे. दरम्यान, ट्रकचालकास पोलिसांनी अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार असे समजते आहे की,महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा ट्रक (एमएच ४३/यु ७११९) आणि मुंबई बाजूकडून गुहागरकडे निघालेली इको कार (एमएच ४८/बीटी८६७३) यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन हा भीषण अपघात घडला. यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात ४ स्त्रिया आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. सुमारे ३ ते ४ वर्षाचा चिमुकला बालक जखमी होऊन वाचला होता. मात्र काही उपचार काळात त्याचा काही तासातच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली.
इको कारमधून प्रवास करणारे सर्वजण हे मुंबई, मालाड येथील असून गुहागर तालुक्यातील हेदवीकडे ते निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण नावले आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी दाखल झाले आणि रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मृतांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.तसेच जखमी चिमुकल्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले, मात्र काही वेळात त्याचा मृत्यू झाला.सदर अपघाताचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.
मृतांची नावे
अमोल रामचंद्र जाधव (४०) ,दिनेश रघुनाथ जाधव (३६),कांचन काशिनाथ शिर्के (५०),नंदिनी निलेश पंडित- (३५),निलेश पंडित (४२) ,अनिता संतोष सावंत (५५), मुद्रा निलेश पंडित (१२), लाड मामा (५८),निशांत शशिकांत जाधव (२३). निलेश पंडित (४).