घरक्रीडाशरीरसौष्ठवाचे भाई गेले

शरीरसौष्ठवाचे भाई गेले

Subscribe

बृहन्मुंबई शरीरसौष्ठवाचे आजीवन अध्यक्ष सत्यवान कदम यांचे निधन

शेकडो शरीरसौष्ठवपटूंना घडविणार्‍या मातृछाया व्यायामशाळेचे सर्वेसर्वा, मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाचे खरेखुरे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आणि शरीरसौष्ठवाचे भाई असलेले सत्यवान उर्फ भाई कदम यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, ३ मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

मुंबईतील शरीरसौष्ठवाला भारतातील सर्वात शक्तिशाली संघटना बनविण्याचे कौशल्य दाखविण्याची किमया भाई यांच्याच अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेने करून दाखविली. भाईंनी शरीरसौष्ठवाची चळवळ उभारल्यामुळे आणि तरूणाईला फिटनेसचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिल्यामुळेच मुंबईत मोठ्या संख्येने व्यायामशाळांची निर्मिती होऊ लागली. त्यांच्या या कार्यामुळे शरीरसौष्ठवात त्यांचा दरारा होता. त्यांचे शब्द हे अंतिम मानले जायचे. आपले अवघे आयुष्य शरीरसौष्ठव खेळाच्या प्रचार, प्रसार आणि प्रगतीसाठी समर्पित करणारे भाई स्वत: एक पीळदार देहयष्टीचे शरीरसौष्ठवपटू होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. तसेच त्यांनी ६०च्या दशकात ‘भारत श्री’ हा बहुमानही मिळवला.

- Advertisement -

मुंबई शरीरसौष्ठवाची सुत्रे एकहाती सांभाळणार्‍या भाईंनी १९७१ साली दादर कबुतरखान्याशेजारी मातृछाया व्यायामशाळा सुरू केली. ही नुसती व्यायामशाळा नव्हती तर राष्ट्रीय दर्जाच्या शरीरसौष्ठवपटूंच्या निर्मितीचा तो कारखाना होता. या कारखान्यातून मधुकर थोरात, शाम रहाटे, विकी गोरक्ष, मोहनसिंग गुरखा, विनय दलाल, भाऊ गुजर, वॉल्टर फर्नांडिस, प्रकाश गव्हाणे, प्रविण गणवीरसारखे हिरे शरीरसौष्ठव खेळाला सापडले. भाईंकडे शरीरसौष्ठवाचे अफाट ज्ञान आणि माहिती असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शेकडो खेळाडू त्यांच्याकडे यायचे. तसेच अनेक ठिकाणी ते स्वत: मार्गदर्शन शिबीरे घ्यायचे. शरीरसौष्ठवात असंख्य खेळाडू घडविल्याबद्दल राज्यशासनाने १९९१ साली दादोजी कोंडदेव राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले होते. मुंबई शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष असलेल्या भाईंच्या नेतृत्वाखालीच अनेक जागतीक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्पर्धांचे आयोजन मुंबईत केले गेले.

शरीरसौष्ठवाची अपरिमित हानी

भाई यांच्या निधनाचे वृत्त कळताच शरीरसौष्ठवावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने मुंबई शरीरसौष्ठवाची अपरिमित हानी झाल्याची भावना भारतीय शरीरसौष्ठवाचे सरचिटणीसी चेतन पाठारे यांनी व्यक्त केली. भाई हे शरीरसौष्ठवाचे अखंड मार्गदर्शक होते, राजदूत होते. त्यांच्या मृत्युमुळे शरीरसौष्ठव खेळाची कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया मुंबई शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी व्यक्त केली. मुंबई शरीरसौष्ठवाचे पितृछत्र हरपल्याची श्रद्धांजली सरचिटणीस राजेश सावंत यांनी वाहिली. महाराष्ट्राने शरीरसौष्ठव क्षेत्रातील उत्कृष्ट मार्गदर्शक गमावल्याची श्रध्दांजली विक्रम रोठे यांनी वाहिली. भाईंवर दुपारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. करोनाच्या संकटामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे मोजकेच नातेवाईक होते. मात्र याप्रसंगी त्यांचे शिष्य असलेले शाम रहाटे आणि मधुकर थोरात यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -