करोनामुळे जगातील बहुतांश खेळ बंद असून क्रिकेटही याला अपवाद नाही. जवळपास दोन महिन्यांत क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. मात्र, आता काही देशांत लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यामुळे पुन्हा क्रिकेट सुरू करण्याबाबत चर्चा होत आहे. त्यातच आता आयसीसीने क्रिकेट पुन्हा सुरू करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. क्रिकेट पुन्हा सुरु करतानाच सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आणि सर्व नियम पाळण्याचे आदेशही आयसीसीने दिले आहेत. परंतु, आयसीसीच्या या मार्गदर्शक तत्त्वांबाबत अधिक स्पष्टता गरजेची आहे, असे बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनला वाटते.
करोना विषाणू तीन किंवा सहा नाही, तर बारा फुटांपर्यंत पसरतो असे आता ऐकायला मिळत आहे. यात तथ्य असेल तर दोन फलंदाजांनी षटकांदरम्यान खेळपट्टीच्या मध्ये येऊन चर्चा करायची नाही का? त्यांनी आपापल्या जागीच थांबायचे का? सामने प्रेक्षकांविना होणार का? यष्टिरक्षकाला फलंदाजापासून किती अंतर ठेवावे लागणार? क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या जवळ उभा राहू शकणार नाही का? या सर्व गोष्टींबाबत अधिक स्पष्टता आली पाहिजे. यावर अजून चर्चा होण्याची गरज आहे, असे शाकिब म्हणाला.
जीव सर्वात महत्त्वाचा!
आयसीसी पूर्ण विचार करूनच कोणताही निर्णय घेईल आणि खेळाडूंच्या जीवाशी खेळणार नाही याची शाकिबला खात्री आहे. करोनापासून धोका नाही आणि परिस्थिती खेळण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री असल्याशिवाय आयसीसी पुन्हा क्रिकेटला सुरुवात करणार नाही. लोकांचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयसीसी सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेईल, असे शाकिबने सांगितले. शाकिबवर सध्या एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. मॅच फिक्सिंगसाठी बुकीने त्याच्याशी संवाद साधला, पण याबाबतची माहिती आयसीसीला न दिल्याने शाकिबवर ही कारवाई करण्यात आली.