पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला वेस्टइंडीजविरूध्द सुरू होणाऱ्या मालिकेच्या पूर्वसंध्येलाच पत्रकार परिषदेत पत्रकार सारखेच प्रश्न विचारत होते. पत्रकार त्याच्या कडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की टी-२० विश्वचषकादरम्यान बाबर आणि कोहलीमध्ये काय चर्चा झाली होती. सोबतच विराटला कर्णधार पदावरून हटवण्यात आले आहे. यावर पाकिस्तानच्या कर्णधाराचे काय मत आहे?. बाबरला याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नव्हती. मात्र जेव्हा पत्रकारांनी न थांबता आणखी प्रश्न विचारले तेव्हा बाबर आझम चांगलाच भडकला आणि त्याने म्हंटले की, “हे बघा आमच्यामध्ये जी काही चर्चा झाली ती मी सर्वांसमोर उघड बोलू शकत नाही. ती आम्हा दोघांत झाली आहे. याबाबतीत तुम्हाला सांगणे योग्य नाही”.
दरम्यान टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यामध्ये भारत पाकिस्तान पहिल्या सामन्याच्या अखेरीस चर्चा झाली होती. त्यांचा फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
२९ वर्षानंतर भारताचा पराभव
भारत-पाकिस्तान बहुचर्चित सामन्यात भारतीय संघाला मोठा झटका बसला होता. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघाने भारताचा विश्वचषकात दारूण पराभव केला होता. १९९२ नंतरच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार होता ज्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला पाकिस्तान कडून पराभव स्विकारावा लागला होता. १९९२ पासून २०२१ पर्यंत टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकात भारत-पाकिस्तानचे संघ १३ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने १२ आणि पाकिस्तानने १ सामना जिंकला आहे.
टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये सर्वाधिक धावा बाबर आझमच्याच नावावर आहे. त्याने ६ सामन्यांत ३०३ धावा केल्या होत्या. बाबरने या धावा १२६.२५ च्या स्ट्राइक रेटनुसार केल्या आहेत. विश्वचषकाच्या पूर्ण हंगामात पाकिस्तानच्या कर्णधाराने २८ चौकार आणि ५ षटकार लगावले होते. सोबतच त्याने ६ सामन्यांत ४ अर्धशकते झळकावली होती.
हे ही वाचा : http://Big Bash league 2021 : आंद्रे रसेलचा जोरदार कमबॅक; २०० च्या स्ट्राइक रेटने केली फलंदाजी