सात वर्षांच्या बंदीनंतर केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) वादग्रस्त गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतला पुन्हा राज्य संघात देण्याचा निर्णय घेतला आहे. ३७ वर्षीय एस. श्रीशांतची बंदी सप्टेंबरमध्ये संपेल आणि त्यानंतर त्याला राज्याच्या रणजी क्रिकेट संघात खेळता येणार आहे. २०१३ मध्ये आयपीएल सामन्यात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एस श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती, परंतु श्रीसंतने त्या विरोधात न्यायालयीन लढा दिला. २०१८ मध्ये केरळ उच्च न्यायालयानेही बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याच्या निर्णयाला रद्द केलं होतं. परंतु २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याचा गुन्हा कायम ठेवत बीसीसीआयला शिक्षेचं प्रमाण कमी करण्यास सांगितलं. नंतर बीसीसीआय लोकपालने आजीवान बंदी सात वर्षांवर आणली जी सप्टेंबर २०२० मध्ये संपणार आहे. त्यामुळे त्याला सप्टेंबरमध्ये केरळच्या रणजी संघात निवड करण्यात आली आहे. “मला संधी दिल्याबद्दल मी केरळ क्रिकेटचा खरोखर ऋणी आहे. मी माझ्या तंदुरुस्तीसह खेळात तुफानी पुनरागमन करेन. सर्व वादांना लगाम घालण्याची वेळ आता आली आहे,” असं श्रीशांत म्हणाला.
हेही वाचा – थुंकीला पर्याय कॉटनच्या टॉवेलचा!
श्रीसंतने देशाकडून खेळताना २७ कसोटी सामन्यांत ८७ विकेट्स घेतल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ बळी घेतले आहेत. एस. श्रीशांत २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य होता. श्रीशांतने दोन्ही विश्वचषकांचे अंतिम सामने खेळले आहेत.