टी-२० विश्वचषकात सुरू असलेला भारत विरूध्द अफगाणिस्तानचा सामना फारच रंगत ठरत आहे. भारतीय संघासाठी करो या मरोच्या सामन्यात भारतीय सलामीवीर फलंदाजांकडून आक्रमक सुरूवात पहायला मिळाली. पहिल्या डावात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २ बाद २१० धावा केल्या. भारतीय संघाची पहिल्या १० षटकांत एकही गडी न गमावता ८५ एवढी धावसंख्या होती. भारताच्या सलामीवीर जोडीच्या शतकीय भागीदारीच्या बदल्यात भारताने अफगाणिस्तानला २११ धावांचे विशाल लक्ष्य दिले.
तत्पुर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचे गोलंदाज भारतीय फलंदा़जांच्या आक्रमक माऱ्यासमोर पूर्णत: चितपट झाल्याचे पहायला मिळाले. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ४७ चेंडूत ७४ धावा केल्या तर त्याचा साथीदार के.एल राहुलने ४८ चेंडूत ६९ धावा करून संघाची मोठी धावसंख्या बनवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. शेवटच्या काही षटकांत हार्दिक पांड्याने १३ चेंडूत ३५ धावांची धमाकेदार खेळी खेळून भारताची धावसंख्या दोनशेच्या पार नेली.
तर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. गुलबदिन नायब आणि करीम जनातला प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. अफगाणिस्तानने आपल्या तीन सामन्यातील दोन सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान ४ अंकासह ग्रुप बी च्या दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर भारतीय संघापुढे या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीच्या स्पर्धेत आपले स्थान कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.