न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. त्यानंतर टॉम लेथम आणि डेवॉन कॉन्वे या सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी ७० धावांची सलामी दिली आणि त्यांना अडचणीत टाकण्यात भारताचे वेगवान गोलंदाज अपयशी ठरले. भारताच्या जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या तेज त्रिकुटाला ढगाळ वातावरण व वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीचा फायदा घेता आला नाही. या अंतिम सामन्यापूर्वी एखादा सामना न झाल्याचा फटका भारतीय गोलंदाजाना बसल्याचे मत न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल यांनी व्यक्त केले.
सराव करण्यासाठी सामना नाही
भारतीय गोलंदाजांना पुरेसा सराव मिळाला का? या गोष्टीचा आपण विचार करत आहोत. माझ्या मते, भारतीय गोलंदाजांना सरावासाठी वेळ मिळाला. त्यांनी सामन्यापूर्वी १०-१२ दिवसांत बरीच षटके टाकली असतील. त्यामुळे अंतिम सामन्याच्या तयारीसाठी त्यांना मदत झाली असेल. परंतु, केवळ सराव करणे आणि सराव करण्यासाठी सामना खेळणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, असे डूल म्हणाले.
या गोष्टीचा फटका बसला
तुम्ही सराव करताना सामन्यातील परिस्थिती निर्माण करू शकत नाही. तुम्ही आपापसात सामना खेळू शकता, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. सराव सामना खेळून तुमची जी तयारी होते, ती केवळ नेट्समध्ये सराव करून होत नाही. याच गोष्टीचा भारतीय गोलंदाजांना फटका बसला, असे डूल यांनी सांगितले. भारताने आपला अखेरचा कसोटी सामना मार्चमध्ये खेळला होता. तर दुसरीकडे न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले.