घरठाणेमीरा-भाईंदर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ५१६.७८ कोटी निधी मंजूर

मीरा-भाईंदर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ५१६.७८ कोटी निधी मंजूर

Subscribe

पुढील ३० वर्षाची शहराची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून ही पाण्याची योजना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून आम्ही मंजूर करून आणली असून, २१८ एमएलडी पाणी मीरा भाईंदरला पुढील वर्षी मिळणार आहे

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, तसा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. ५१६.७८ कोटी रुपये खर्चास ही मान्यता मिळाली असून त्यातून मीरा भाईंदरमध्ये पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभारली जाणार आहे. पुढील ३० वर्षाची शहराची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून ही पाण्याची योजना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून आम्ही मंजूर करून आणली असून, २१८ एमएलडी पाणी मीरा भाईंदरला पुढील वर्षी मिळणार आहे. मीरा भाईंदर शहराच्या दृष्टीने अत्यंत असा महत्त्वाचा हा निर्णय असून पुढील दीड महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण करून या कामाचा शुभारंभ नवीन वर्षात केला जाईल, अशी माहिती आज आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. कामाची सुरुवात झाल्यानंतर पुढील २४ महिन्यात हा पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
मीरा भाईंदर शहरात विविध भागात आजही पाण्याची कमतरता आहे. ४० ते ४२तासांनी काही भागात पाणी पोहोचते. शहराची पाण्याची ही समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी म्हणून गेले ३ वर्षे ‘एमएमआरडीए’कडून सूर्या पाणी योजनेचे काम सुरु असून त्यातून २१८ एमएलडी पाणी मीरा भाईंदर शहराला मिळणार आहे. हे पाणी मीरा भाईंदर शहराच्या वेशीपर्यंत येणार आहे. सूर्या योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, पुढील वर्षी हे पाणी शहराच्या वेशीपर्यंत आणण्याचा प्रयत्न राहील. हे २१८ एमएलडी पाणी शहरात आल्यानंतर त्याचे शहरात वितरण करण्यासाठी शहरात नवीन जलुकुंभ , नवीन पाईपलाईन टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी ५१६ कोटी इतका प्रकल्प निधीसह मंजूर करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीत या पाणी पुरवठा प्रकल्पाबाबत तत्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकल्प मंजुरीचा शासन निर्णय प्रसिद्ध व्हावा म्हणून आमदार सरनाईक प्रयत्नशील होते व २ नोव्हेंबर रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने आता या कामाची निविदा प्रक्रिया करण्यास मीरा-भाईंदर महापालिका मोकळी झाली आहे.
शासन निर्णय प्रसिद्ध 
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात विविध कामे सुरु आहेत. या अमृत अभियानाअंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेच्या रुपये ५१६.७८ कोटी प्रकल्प किमतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून मान्यता दिली आहे. या प्रकल्पावर ५१६ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यातील केंद्र सरकार ३३ टक्के , राज्य सरकार ३७ टक्के अनुदान देणार आहे. तर या प्रकल्प खर्चात महापालिका ३० टक्के हिस्सा उचलणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने यामध्ये वित्त आयोगामधून महापालिकेने १२६ कोटींची मागणी केली असून वित्त आयोगाकडे महापालिकेच्या हिश्श्याची तरतूद केली आहे. या प्रकल्प मंजुरीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर आता लगेच महापालिका निविदा प्रक्रिया सुरु करणार आहे. पुढील दीड महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण  झाल्यावर कामाची वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) दिला जाणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्याचा निधी महापालिकेकडे सरकारकडून वर्ग होईल. त्यानंतर या कामाच्या प्रगतीनुसार सरकारकडून निधी टप्प्या टप्प्याने महापालिकेला वर्ग केला जाईल , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
पाणी योजनेत कोणकोणती कामे होणार?
सूर्या योजनेचे २१८ एमएलडी पाणी शहरात आल्यानंतर ते पाणी साठविण्यासाठी व पाणी वितरित करण्यासाठी मीरा भाईंदर मनपा हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी नवीन २३ जलकुंभ म्हणजे पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. तसेच ३८ किलोमीटरची मुख्य पाईप लाईन टाकली जाणार आहे. तर शहरात अंतर्गत जलवितरण वाहिन्या १७७ किलोमीटर इतक्या टाकल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा योजनेची इतर सर्व तांत्रिक कामे , वितरण व्यवस्था आधुनिक पद्धतीने उभारली जाईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरात लवकर या कामाचा श्रीगणेशा करण्याचा आमचा प्रयत्न राहील , असे आमदार सरनाईक म्हणाले.
३० वर्षांची पाण्याची गरज पूर्ण होणार 
मीरा भाईंदर शहराने गेले अनेक वर्ष पाण्याचा त्रास सहन केला आहे. त्यामुळे सध्या व भविष्यात वाढणारी शहराची लोकसंख्या लक्षात घेता सूर्या योजनेचे २१८ एमएलडी पाणी योजना आम्ही मार्गी लावली. त्या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. आता त्याचवेळी ५१६ कोटी खर्च करून हे २१८ एमएलडी पाणी शहरात वितरित करण्यासाठी संपूर्ण नवीन पाणी वितरण व्यवस्था पुढील दीड ते दोन वर्षात तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सूर्या योजनेचे पाणी शहरात आधी येईल. तोपर्यंत ५१६ कोटी योजनेचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न वायुवेगाने आम्ही करू , असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. मीरा भाईंदर शहराची पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज ओळखून हे ‘वन टाइम प्लॅनिंग’ आम्ही केले आहे. त्यामुळे जेव्हा हे पाणी योजनेचे काम पूर्ण होईल त्यावेळी मीरा भाईंदरच्या नागरिकांना पुढील २५ वर्षाची पाण्यासाठीची चिंता नसेल , असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे आभार – आमदार सरनाईक 
मीरा भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शेकडो कोटींची विकासकामे मंजूर झाली आहेत , अनेक विकासकामे सुरु आहेत. पण पाणी पुरवठा हा प्रत्येक नागरिकांशी निगडित असा विषय असून माझ्या विनंतीला मान देऊन अगदी जलद गतीने ५१६ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी देत त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. याकामी आयुक्त दिलीप ढोले तसेच पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे यांनीही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले , आता त्यांनी लवकरात लवकर या योजनेचे काम प्रत्यक्षात सुरु करावे , अशा सूचनाही आमदार सरनाईक यांनी आज दिल्या आहेत.
Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -