महाविकासआघाडीची सत्तास्थापना दृष्टीपथात येत असतानाच अचानक अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा जाहीर केला आणि सगळाच गोंधळ पुन्हा सुरू झाला. महाविकास आघाडीला पाठिंब्यासाठी तयार केलेल्या आमदारांच्या सह्यांचं पत्रच अजित पवारांनी पळवलं आणि ते भाजपला पाठिंब्यासाठी सादर केलं. यामुळे राज्यात अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळत असून त्यामुळे महाविकासआघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवलं आहे. मात्र, या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ आणि दिलीर वळसे पाटील एकात्र दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
राष्ट्रवादीचं नक्की चाललंय काय?
खुद्द अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून जाऊन भाजपसोबत सत्तेत बसल्यामुळे महाविकासआघाडीतल्या शिवसेना आणि काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली जात आहे. अजित पवारांच्या बंडखोरीला अजून आमदारांची साथ मिळू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. मात्र, असं असतानाच छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील देखील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत दिसल्यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट्टीची चर्चा रंगू लागली आहे.
फडणवीस-अजितदादांसाठी थांबले भुजबळ-वळसे पाटील!
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे देखील तिथे पोहोचले. मात्र, लागलीच आदरांजली वाहण्यासाठी न जाता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाट पाहिली. ते आल्यानंतर चौघांनी मिळून आदरांजली वाहिली. सत्तास्थापनेचा पेच एकीकडे निर्माण झालेला असताना या चौघांनी एकत्र येणं अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे.
दरम्यान, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची यावेळी पुन्हा एकदा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जातं. त्यांच्यामध्ये दीर्घकाळ चर्चा झाल्याचं देखील बोललं जात आहे.