‘मावळमध्ये नागरिकांनी हिंमत दाखवली. ताकद दाखवली आणि पार्थबापूला घरी पाठवले. कर्जत–जामखेडमध्ये ताकद आहे का? मी तुम्हाला विचारतो? तुम्ही मग या ठिकाणी आलेले रोहितबापूचे पार्सल परत पाठवणार का? बघू या २४ तारखेला मावळवाल्यांमध्ये जास्त ताकद आहे का? कर्जत–जामखेडवाल्यांमध्ये जास्त ताकद आहे. याचा फैसला होऊन जाऊ द्या, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत–जामखेडवासीयांना केले आहे‘. कर्जत–जामखेड आणि कोपरगाव येथे महायुतीच्या उमेदवार राज्याचे मंत्री राम शिंदे आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभांमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शरद पवारांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
पवारांना नागपूरकर गुंड दिसतात
‘शरद पवारांना सगळे नागपूरकर गुंड दिसायला लागले आहेत. आमची केवढी दहशत पसरली आहे. हो. नागपूरच्या माझ्यासारखा साधारण माणसाने पवार साहेबांना एवढे जेरीस आणले आहे की त्यांना सगळे नागपूरकर गुंडच दिसायला लागले. ही वेळ तुमच्या आशीर्वादामुळे आली आहे, असे म्हणत पवारांवर मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
रामभाऊ सामान्य गडी नाही
‘मला विश्वास आहे. आमचा रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे. हा मोठ्या मोठ्यांना पुरून उरलेला कलाकार माणूस आहे. हा काही हार मानत नाही. आमच्या मुंडे साहेबांच्या नेतृत्वात तयार झालेला माणूस आहे. हा सामान्य गडी नाही. हा गडी असा आहे, कितीही मोठा पहिलवान आला, त्याला चितपट केल्याशिवाय रामाभाऊ सोडतच नाही. सामान्य घरातला मुलगा आपल्या मेहनतीने शिकून प्राध्यापक झाला. आमदार झाला आणि आज मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचा मंत्री म्हणून उभ्या महाराष्ट्रात त्याने नाव कमावले. अशा सामान्य घरच्या मुलाला लोकांनी नेता बनवले. जेव्हा लोक आपले नेतृत्व निवडतात. तेव्हा येथे कोणीतरी नेतृत्व थोपवतय. पण येथे थोपलेल नेतृत्व नाही. तर येथे घडलेल्या नेतृत्वाच्या म्हणजे रामभाऊंच्या मागेच जनता उभी राहील,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
धरणातले १५ टक्के पाणी पिण्याकरता राखीव
‘निळवंडे प्रकल्पाकरता सरकारने पैसा दिला. राधाकृष्ण विखे पाटील आणि स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. आपण कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविला. पण काही लोकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. कोणत्याही धरणातले १५ टक्के पाणी कायद्यानुसार पिण्याकरता राखीव ठेवावे लागते. त्या राखीव पाण्यातूनच कोपरगावाला पाणी दिले. शेतकऱ्याच्या पाण्याचा आपण थेंब देखील काढला नाही. पण विरोधी उमेदवारांनी लोकांना भडकवले. कोर्टात जायला लावले. पण आता आम्ही ठरवले आहे. दरवर्षी कमी पाऊस पडला की मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नगर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा असा संघर्ष तयार होतो. आता हा संघर्ष संपवला पाहिजे. गोदावरीच्या खोऱ्यातील तूट भरून काढली पाहिजे. पश्चिम वाहिन्यांनचे नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारे १६८ टीएमसी पाणी उचलून टनेल्सच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणून नगर, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भांडण कायमचे संपेल‘, असे देखील मुख्यमंत्री पुढे म्हणाले आहेत.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या प्रचाराचा नारळ जळगावात फुटणार