पाच दिवसांपूर्वी डोंबिवलीत रेल्वेतून पडून २२ वर्षीय तरुणाची मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना काल, शुक्रवारी कांजुरमार्ग स्थानकात ४९ वर्षीय महिला रेल्वेतून पडून जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सीताबाई अभंगे असे या महिलेचे नाव आहे. पवई येथील ही महिला काल दुपारी रेल्वेतून खाली पडून जखमी झाल्याचे समजते. या अपघातात महिलेला मेंदू तसेच इतर अवयवांना दुखापत झाली असून तिच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कुर्ला जीआरपी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कांजुरमार्ग रेल्वे स्थानकापासून ५० मिटर अंतरावर रेल्वे असताना हा अपघात झाला. रेल्वे डब्यात खुप गर्दी असल्यामुळे दारात लटकत असलेल्या सीताबाई चालत्या गाडीतून तोल जाऊन बाजूच्या रेल्वे रुळावर पडल्या. त्यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
यापूर्वी लोकलमधील गर्दीमुळे २२ वर्षीय तरूणीला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी डोंबिवली कोपरदरम्यान घडली होती. चार्मी पासड वय २२ असे त्या तरूणीचं नाव होते. अपुऱ्या लोकल आणि वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून जीव गमवावा लागल्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीचे आणखी किती बळी घेणार? असा संतप्त सवाल प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.