जगभरात हाहाःकार माजवलेल्या करोना व्हायरसची धास्ती आता भारताने सुद्धा घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी रात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करत लोकांना उंबरठा ओलांडण्याची सक्ती केली. मात्र तरिही काही अतिउत्साही लोक विनाकारण घरातून बाहेर पडत आहेत. मुंबईतील कांदिवली येथे देखील एक तरुण असाच घराबाहेर पडला, मात्र त्याला यामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. कांदिवलीच्या समता नगर येथे एका सख्ख्या भावाने घराबाहेर पडलेल्या आपल्याच भावाची हत्या केली आहे. लोकसत्ता या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.
समता नगर पोलिसांनी संबंधित आरोपी भावाला अटक केली आहे. आरोजी राजेश ठाकूर याने आपला लहान भाऊ दुर्गेशला लॉकडाऊनमध्ये घराबाहेर निघू नको, असे बजावले होते. तरिही दुर्गेश मोठ्या भावाची सूचना न मानता घराबाहेर पडला. या रागातून राजेशने आपल्याच भावाची हत्या केली. दुर्गेश हा पुण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होता, मात्र करोनाचा प्रादुर्भावामुळे त्याच्या कंपनीने सुटी जाहीर केली होती.
पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणातील इतर माहिती देखील समोर आलेली आहे. दुर्गेश घराबाहेर पडून पुन्हा आल्यानंतर मोठा भाऊ राजेश आणि त्याच्या पत्नीने दुर्गेशसोबत वाद घातला होता. वाद टोकाला गेल्यानंतर राजेशनने धारदार शस्त्राने आपल्याच छोट्या भावाची हत्या केली. त्यानंतर दुर्गेशला रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.