जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोरोनावरील लस कधी येणार याकडे साऱ्याचं लक्ष लागले आहे. अशापरिस्थितीत भोपाळच्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोरोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करण्याचा उपाय सांगितला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सरकारकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करून कोरोना बरा होण्याचा उपाय सूचवला आहे.
आइए हम सब मिलकर कोरोना महामारी को समाप्त करने के लिए लोगों के अच्छे स्वास्थ्य की कामना के लिए एक आध्यात्मिक प्रयास करें आज25 से 5 अगस्त तक प्रतिदिन शाम 7:00 बजे अपने घरों में हनुमान चालीसा का 5 बार पाठकरें5 अगस्त को अनुष्ठान का रामलला की आरती के साथ घरों में दीप जलाकर समापन करें pic.twitter.com/Ba0J2KrkA8
— Sadhvi Pragya singh thakur (@SadhviPragya_MP) July 25, 2020
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की “चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचे पठण करावे. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा”
दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या २४ तासांत देशभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८ ते रविवारी सकाळी ८ पर्यंत देशभरात कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४८ हजार ६६१ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ झाली आहे. तर २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ७०५ लोकांचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंत देशात एकूण ३२ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.