पोलीस दलातील बदल्या करण्यासाठी रॅकेट कार्यरत होतं, त्यासंबंधीत एक मोठा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. सगळी माहिती त्यांच्याकडे आहे. ही सगळी माहिती घेऊन ते दिल्ली जाणार आहेत. तिथे ते केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आणि ही सगळी माहिती गोपनीय असल्याने ते त्यांना देणार आहेत. तसंच फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर पोलीस दलात बदल्यांसाठी सुरु असलेल्या रॅकेटचा तपशील मांडला. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही सगळी माहिती पोलीस महासंचालकांना दिली होती. त्यानंतर ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, त्यावर कारवाई होणे तर सोडाच पण उलट रश्मी शुक्ला यांची बढती रोखण्यात आली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फोन टॅपिंगचा अहवाल २५ ऑगस्टला प्राप्त झाला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, असं फडणवीस म्हणाले. आपल्याकडे पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटविषयी संवेदनशील माहिती असल्याचा दावा केला. ही माहिती खूपच संवेदनशील असल्याने मी ती प्रसारमाध्यमांना देऊ शकत नाही. ही माहिती घेऊन मी केंद्रीय गृहखात्याच्या सचिवांना भेटणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली. पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली.
रश्मी शुक्ला यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. २६ तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणं गरजेचं आहे, असं पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र, यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृहमंत्रालयाने कारवाई करणं सोडाच पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा – अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला मुंबईत; त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय – फडणवीस