नाशिक : जिल्ह्यात मान्सूनने दडी मारल्याने ग्रामीण भागात ऐन पावसाळयात टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होउ लागल्या आहेत. जिल्ह्यातील २५२ गावे आणि वाड्यांना आजही ८४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.नाशिकमध्ये मान्सूनपूर्व सरींवगळता चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. परिणामी जिल्ह्यात ऊकाडा कायम असताना दुसरीकडे ग्रामीण भागात टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण जनतेला पाण्यासाठी टँकर वर अवलंबून राहावे लागत आहे. दोन-तीन तालूकेवगळता अन्य ठिकाणी गावात टँकर आल्यावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडत असल्याचे चित्र नजरेस पडते आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ८४ टँकरच्या माध्यमातून २५२ ठिकाणी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ८४ गावे-वाड्यांसाठी केवळ ४१ टँकर सुरू होते. दरम्यान, यंदा येवल्यात सर्वात जास्त २० टँकर सुरू असून त्याद्वारे ५३ गावे-वाड्यांना पाणी पुरविले जात आहे. सिन्नरला ८० गावे-वाड्यांसाठी १४ टँकर धावताहेत. मालेगावी ११ टँकरने २३ ठिकाणी तर बागलाणला २० ठिकाणी १० टँकरने प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत राज्यात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज वर्तविला आहे. काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या दृष्टीने हा काहीसा दिलासा देणारा अंदाज असला तरी ग्रामीण भागातील पाण्याचे स्त्रोत पुनर्जिवित होण्यासाठी आणखीन काहीकाळ द्यावा लागेल. तोपर्यत मात्र, ग्रामीण जनतेच्या नशिबी टँकरचा फेरा कायम असणार आहे.