दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. यंदा आपण सर्वजण भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. याचनिमित्ताने आपल्या देशाबद्दल आणि तिरंग्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला हवे. आपल्या भारतीय ध्वजाचे प्रमुख तीन रंग आणि त्याचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक असते, मात्र तुन्हा ध्वजातील अशोक चक्राबाबत काही माहिती आहे का?
काय आहे अशोक चक्राचे महत्त्व?
अशोक चक्राची स्थापना वाराणसीच्या सारनाथमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्याहस्ते करण्यात आली होती. सम्राट अशोक यांच्या अनेक शिलालेखांवर अशोक चक्राची निर्मिती करण्यात आली आहे. याच अशोक चक्राला भारताच्या राष्ट्रध्वजात मानाचे स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये एकूण 24 आरे आहेत आणि या अशोक चक्राचा रंग नेहमी निळ्या रंगाचा असतो.
अशोक चक्राचा रंग निळा का असतो?
खरंतर अशोक चक्राचा रंग आकाश, महासागर आणि सार्वभौमिक सत्याला दर्शवतो. त्यामुळेच भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मधोमध पांढऱ्या पट्टीमध्ये अशोक चक्र असते. यामध्ये 24 आरे असतात. जे मनुष्याचे 24 गुण दर्शवतात.
चरखा काढून तिरंग्यात करण्यात आला अशोक चक्राचा सहभाग
भारताचा राष्ट्रध्वज बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना एक काळ असा होता की राज्यघटनेपूर्वी राष्ट्रध्वजात अशोक चक्राच्या जागी चरखा बसवला जात होता, परंतु संविधान निर्मात्यांनी चरख्याच्या जागी अशोक चक्र बसवले. यानंतर 24 जुलै 1947 रोजी संविधान सभेने हा तिरंगा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला.