मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती बिघडली आहे. काही राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत आज किमान तापमान 27 अंश तर कमाल तापमान 36 अंश राहील. दिल्ली आणि लगतच्या भागात आज जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. शिवाय, पुढील पाच ते सहा दिवस दिल्लीत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय यूपी, बिहारमध्ये पुढील दोन दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये नद्या धोक्याच्या चिन्हाच्या वर आहेत. दरम्यान, आगामी चार दिवस आसाम, मेघालय, तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 27 ऑगस्ट रोजी ओडिशामध्ये, 27-29 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आणि 27 आणि 28 ऑगस्ट रोजी दक्षिण पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसेच 28 ऑगस्ट रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 25 ऑगस्टला जम्मू-काश्मीर, 28 ऑगस्टला हिमाचल प्रदेश आणि 28 आणि 29 ऑगस्टला उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल. ईशान्य भारताबद्दल बोलायचे झाले तर नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 27 ते 29 ऑगस्टपर्यंत आणि आसाम आणि मेघालयमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, 26 ऑगस्ट रोजी दक्षिण कर्नाटक, 27 आणि 28 ऑगस्ट रोजी तेलंगणा आणि पुढील पाच दिवस तामिळनाडूमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, ओडिशात पूरस्थिती
मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. यूपीमध्ये गंगा, यमुना या नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा – कामाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग वाढवा; ‘वर्क फ्रॉम होम’वर भर देण्याचा पंतप्रधान मोदींचा सल्ला