मुंबईः नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या १५६ तळीरामांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. वेगाने वाहन चालवणाऱ्या ६६ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे नवीन वर्षाच्या स्वागतावर निर्बंध होते. २०२२ ला निरोप देताना कोणतेही निर्बंध लादण्यात आले नव्हते. त्यामुळे मुंबईकरांनी नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले.
या वर्षी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन जोरदार होणार याचा पोलिसांना अंदाज होता. सेलिब्रेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न नको म्हणून पोलिसांनी तयारी केली होती. कोणत्या मार्गावरुन अधिक मद्यपी जातात. कुठे अधिक गर्दी असते, अशा ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. समुद्र किनारे, मोकळी मैदाने, उद्याने, अशा ठिकाणी पोलिसांची विशेष गस्त होती.
पोलिसांच्या नियोजनात १०० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. काही ठिकाणी मार्ग बदलण्यात आले होते. तर काही रस्त्यांवर नो पार्किंग झोन तयार करण्यात आला होता. त्यानुसार नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली. दारु पिऊन वाहन चालवणे, वेगाने वाहन चालवणे, अशा गुन्ह्यांसाठी पोलिसांनी कारवाई केली. सेलिब्रेशनला गालबोट लागेल असे कृत्य घडल्याची तूर्त तरी नोंद नाही. दरम्यान गेल्या वर्षभरात मुंबईत सुमारे दहा हजार जणांवर दारु पिऊन वाहन चालवल्याची कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबईतही दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या १३९ जणांविरोधात कारवाई करण्यात आली. यातील सर्वाधिक कारवाई महापे येथे झाली. येथे १७ जणांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. तर कोपर खैराणे येथे अवघ्या एका तळीरामावर कारवाई झाली आहे.
अभिनेता सलमान खानचे हिट ॲण्ड रन प्रकरण झाल्यानंतर दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठाेर पावले उचलण्याची मोहिम पोलिसांनी सुरु केली. शनिवार, रविवारी तर महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी असेत. सण-उत्सावालाही वाहन चालकांची चाचणी केली जाते. दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या शिक्षेतही वाढ करण्यात आली आहे. आधी दारु पिऊन वाहन चालवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतुद होती. मात्र यासाठी आता दहा हजार रुपयांचा दंड व सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.