मनोर: अवकाळी पावसामुळे ऐन हंगामात जिल्ह्यातील मीठ उत्पादनावर परिणाम झाला आहे.एक हजार एकर क्षेत्रावरील तयार मीठ वाहून गेल्याने मिठागर चालवणार्या सहकारी संस्थांना मोठे नुकसान झेलावे लागले आहे. आर्थिक नुकसान झाल्यामुळे मीठ उत्पादक सहकारी संस्था हतबल झाल्या असून उत्पन्न घटल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत.मीठ उत्पादनाच्या क्षेत्रात असलेल्या सहकारी संस्थांना टिकवण्यासाठी शासकीय मदतीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जानेवारी,फेब्रुवारी महिन्यांमध्ये मिठागरांची मशागत सुरू केली जाते.कडक उन्हे पडायला सुरुवात झाल्यानंतर मार्च,एप्रिल,मे महिन्यात मिठाचे उत्पादन घेतले जाते.मार्च ते मे अशा तीन महिन्यांमध्ये मिठाचे उत्पन्न सहकारी संस्थांना मिळते.मार्च महिन्यापासून अवकाळी पावसामुळे मिठागरांमधील मीठ उत्पादनात घट झाली आहे.पालघर जिल्ह्यामध्ये एक हजार एकर पेक्षा अधिकच्या क्षेत्रावर मीठ उत्पादक सहकारी संस्थांमार्फत मीठ उत्पादन घेतले जाते.
केळवे मीठ उत्पादक सहकारी संस्थेच्या संजीवनी मिठागरामध्ये साडेतीनशे एकरवर मीठ शेती केली जाते. काही प्रमाणात शुद्ध मीठ मिळाले असले तरी अवकाळीमुळे मिठाचे नुकसान झाले असून उत्पादनात घट झाल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.मिठाला दर तसेच बाजारात मागणी नसल्याने उत्पादन कमी झाल्यामुळे संस्थेचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मीठ उत्पादन घेण्याच्या कामात असलेले सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्याची धडपड संस्था करीत आहेत.अवकाळीच्या पावसामुळे नुकसान झालेले असताना मीठ उत्पादक संस्थाकडे दुर्लक्ष होत असून दुर्लक्षित संस्थांना उभारी देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. खारेकुरण मच्छिमार सोसायटी,ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ,सद्गुरू सहकारी संघ या मीठ सहकारी संस्था खारेकुरण येथे ५५० एकर क्षेत्रावर मिठाचे उत्पादन घेत आहेत.अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान संस्थांना सहन करावे लागणार आहे.
अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्यामुळे संस्थांना नुकसान झाले आहे.मिठागरांमध्ये मध्ये काम करणार्या कामगारांच्या हाताला काम मिळत नाही.रोजगारावर परिणाम झाला आहे.
जयकुमार भाय,खारेकुरण मीठ उत्पादक संस्था