ओझर । नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, बाणगंगा बचाव समिती व नागरिकांच्या प्रयत्नांतून अखेर शहरातील बाणगंगा नदीस्वच्छतेच्या कामाला सुरूवात झाली. या उपक्रमामुळे काही दिवसांत प्रदूषणाच्या गर्तेत सापडलेली बाणगंगा नदी मोकळा श्वास घेणार आहे.
मुख्याधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद स्वच्छता निरिक्षक प्रतिक उंबरे, कर्मचारी सागर राऊत, मुकादम अनिल बंदरे यांनी स्वच्छता कर्मचार्यांचे पथक घेत गावाच्या पश्चिमेकडील (शेलार, शिंदे मळा) पुलाखालील नदीप्रवाहात पडलेला कचरा, घाण हटविण्यास प्रारंभ केला आहे. नदी स्वच्छतेसाठी जेसीबी, पोकलॅनसारख्या यंत्रणा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बाणगंगा बचाव समितीचे कार्यकर्तेही या अभियानात सहभागी होत आहेत.
स्व. भरत कावळेंचे स्मरण
येथील पाणीदार व्यक्तीमत्व व समाजपरिवर्तन केंद्राचे प्रवर्तक स्व. भरत कावळे यांच्या संकल्पनेतून २००८ साली बाणगंगा नदीपात्र व बंधारे गाळमुक्त करण्याचे काम करण्यात आले होते. त्यांनी वाघाड प्रकल्प हे मॉडेल महाराष्ट्रापुढे आणले होते. त्यांच्या कामाची दखल शासन व प्रशासन यांनीही घेतली होती. त्यांच्या त्यावेळच्या कामाची आठवण यानिमित्ताने ओझरकरांना झाली.