लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या हिंसक झटापटीमागे चीनचाच हात असल्याचे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भारतीय सैनिकांबरोबर झटापट होण्याआधीच चीनी सैनिकांनी दगडांची जमवाजमव केली होती. तसेच काही अणुकुचीदार व धारदार ताराही त्यांनी घटनास्थळी आणून ठेवल्या होत्या. अशी माहिती समोर येत आहे.
१५ जून रोजी संध्याकाळी कमांडींग ऑफिसर कर्नल संतोष बाबू चीनी सैनिकांना भारतीय क्षेत्रातून मागे हटण्याबद्दल सांगत होते. मात्र त्याआधीच चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर हल्ला करण्याची पूर्वतयारी केली होती. अनेक चीनी सैनिक उंचावर उभे होते. तेथूनच त्यांनी भारतीय सैनिकांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतीय सैनिकांनीही चीनी सैनिकांना मागे हटवण्यासाठी धक्काबुक्की केली. यादरम्यान संतोष बाबू यांनी चीनी सैनिकांना अनेकवेळा शांततेने मागे हटण्यास सांगितले . पण आक्रमक झालेल्या चीनी सैनिकांनी जवानांवर बॅट, काठी व तारेने हल्ला केला. यास भारतीय सैनिकांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या झटापटीत २० जवान शहीद झाले तर ४३ चीनी सैनिक मारले गेले. या घटनेनंतर भारत व चीन यातील संबंध ताणले गेले असून चर्चेतून सीमावाद सोडवण्याची तयारी दाखवण्याचे ढोंग करणाऱ्या चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय सैनिकांनीच हल्ल्यास उकसवल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेशी संबंधित भारतीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.