घरताज्या घडामोडीविरोधकांनी शेतकर्‍यांना भडकवले

विरोधकांनी शेतकर्‍यांना भडकवले

Subscribe

गुजरात दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा कृषी कायद्यांवर भाष्य केले. गुजरातच्या कच्छ येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांवरुन शेतकर्‍यांना भडकवण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचे म्हटले. कृषी कायद्यांबाबतच्या शेतकर्‍यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी दिला.

दिल्लीजवळ सध्या शेतकर्‍यांना घाबरवण्याचे कारस्थान सुरू असल्याचे मोदी म्हणाले. तुमच्याजवळ जर कुणी दुधासाठीचा करार करत असेल तर तो तुमच्या गायी घेऊन जातो का?, असा सवाल उपस्थित करत मोदींनी ज्या पद्धतीने पशूपालन व्यवसायात शेतकर्‍यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्येही आता स्वातंत्र्य येणार आहे, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना या कायद्यासाठीची मागणी करत होते आणि आज विरोधक शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. शेतकर्‍यांचे हित ही सरकारची प्राथमिकता असून त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशाच्या कानाकोपर्‍यातील शेतकरी सरकारसोबत आहे. काहीजण गैरसमज निर्माण करुन शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहेत. शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे, असा आरोप मोदींनी केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. कच्छ हा जगातील सर्वात मोठा हायब्रिड एनर्जी पार्क बनणार आहे. सिंगापूर आणि बहारिनमध्ये ज्या पद्धतीने एनर्जी पार्क आहे. त्या तोडीचा हायब्रिड एनर्जी पार्क कच्छमध्ये तयार होतोय, असे मोदींनी सांगितले. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकर्‍यांना याचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -