श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या सुवर्ण गणेशाचा मुखवटा घडविण्याबरोबरच गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. यासाठी शासन स्तरावर कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्याची माहिती तटकरे दिली.पालकमंत्र्यांच्या विनंतीनुसार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरोड्यात प्राप्त मुद्देमाल राज्यशासनाची मालमत्ता झाली आहे. सद्यस्थितीत हा मुद्देमाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उप कोषागार, श्रीवर्धन येथे पोलीस सुरक्षेत ठेवण्यात आला आहे. या मुद्देमालापासून सुवर्ण गणेश मुखवटा घडविणे आणि सुवर्ण गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करुन त्याचा ताबा मंदिर ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री तटकरे यांनी दिली.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुद्देमालापासून सुवर्ण गणेशाच्या आधीच्या मुखवट्याप्रमाणेच नवीन मुखवटा तयार करुन त्याची प्रतिष्ठापना करायची आहे. लोकभावना लक्षात घेऊन सुवर्ण गणेश प्रतिष्ठापना करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन व दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी समन्वयाने करावी, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैठकीत संबंधितांना दिले. खासदार सुनील तटकरे या बैठकीत उपस्थित होते.
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना लवकरच होणार असल्याने निर्णयावर सर्वत्र आनंद व्यक्त होतो आहे.
काय आहे प्रकरण ?
दिवेआगारातील या सुवर्ण गणपती मंदिरात २४ मार्च २०१२ साली चोरीची घटना घडली होती. दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून मंदिरातील सुवर्ण मूर्ती आणि सोने पळवून नेले होते. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दरोडेखोरांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून वितळवलेले १ किलो ३६१ ग्रॅम सोने हस्तगत केले होते. न्यायालयाने अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुवर्ण गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा केला.
वार्ताहर – अमूलकुमार जैन
हे ही वाचा – दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर: सोन्याच्या मुखवट्याचा तिढा सुटला, काय आहे प्रकरण? मंदिराचा इतिहास काय?