नवी दिल्ली : भाजपाचा आज, शनिवारी स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलद्वारे सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भारतातील 140 कोटी जनतेचे आभार मानले. भाजपाने नेहमीच ‘नेशन फर्स्ट’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे आणि त्या पक्षाला भारतीय जनतेने कायम पसंती दिली आहे, हे आत्मविश्वासाने सांगू शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
ज्यांनी वर्षानुवर्षे परिश्रम, संघर्ष आणि बलिदानाने आपला पक्ष उभा केला त्या सर्व महान महिला आणि पुरुषांचे मी यानिमित्ताने मी त्यांचे स्मरण करतो, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, भाजपाने आपला विकासाभिमुख दृष्टीकोन, सुशासन आणि राष्ट्रवादी मूल्यांबद्दल बांधिलकी दाखवून आपली वेगळी ओळख तयार केली आहे. आपल्या आकांक्षा पूर्ण करू शकणारा आणि 21व्या शतकात भारताला नेतृत्व देऊ शकणारा पक्ष म्हणून भारतातील तरुण भाजपाकडे पाहतात.
हेही वाचा – Lok Sabha 2024: बारामतीबाबत फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद…; जयंत पाटलांचा पलटवार
केंद्र असो वा राज्य, भाजपने सुशासनाची नवी व्याख्या दिली आहे. आमच्या योजना आणि धोरणांमुळे गरीब आणि वंचितांना बळ मिळाले आहे. अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिलेल्यांना घटकांना आमच्या पक्षामुळे आशा मिळाली आहे. सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम केले आहे. आपल्या पक्षाने भारताला भ्रष्टाचार, घराणेशाही, जातिवाद, धर्म आणि व्होट बँकेच्या राजकारणापासून मुक्त केले आहे. देशावर प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्यांचे हे एक वैशिष्ट्य बनले होते, असे सांगत मोदी यांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली आहे.
भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस पर देशभर के मेरे कर्मठ और परिश्रमी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं। आज @BJP4India की उन सभी महान विभूतियों को नमन करने का दिन है, जिन्होंने वर्षों की अपनी कड़ी मेहनत, संघर्ष और त्याग से पार्टी को सींचकर इस ऊंचाई तक पहुंचाया है। मैं…
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2024
राष्ट्रीय प्रगती आणि प्रादेशिक अपेक्षांबाबत भान ठेवणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही देशाच्या विविधतेच्या सुंदर रंगांनी सजलेली आहे. आमची ही भागीदारी खूप महत्त्वाची आहे आणि आगामी काळात आमची ही आघाडी आणखी मजबूत होईल, याची मला खात्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवीन लोकसभा निवडण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. गेल्या दशकभरातील प्रगतीची वाटचाल पुढे अशीच सुरू राहावी, यासाठी जनता आम्हाला आणखी एका कार्यकाळासाठी आशीर्वाद देईल, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Kangana Ranaut: हा तुमच्या IQ च्या पलीकडचा विषय; कंगनानं विरोधकांना झापलं