पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये नेहमीच तुतु-मैंमैं सुरु असतं. दरम्यान, आता तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. तृणमूल काँग्रेसचे बांकुरा येथील खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इंधनाच्या दरवाढीवरुन रॅली काढण्यात आली. यावेळी रॅली दरम्यान त्यांनी भाषणात अर्थमंत्र्यांची तुलना काळ्या नागिणीशी केली. यावरुन आता नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे.
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आपल्या भाषणात म्हणाले की, जशी काळी नागीण डसल्याने माणसांचा मृत्यू होतो, तसंच निर्मला सीतारमण यांच्यामुळे लोक मरत आहेत. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार म्हणाले की अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यांना लाज वाटायला नको का? तुम्ही अर्थव्यवस्था नष्ट केली आणि अजूनही त्याच पदावर आहात. सीतारमण तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. त्या आजवरच्या सगळ्यात कुचकामी अर्थमंत्री आहेत, अशी जहरी टीका बॅनर्जी यांनी केली.
The way people die due to bite of ‘Kala Nagini’
(venomous snake),same way,people are dying due to Nirmala Sitharaman. She has destroyed the economy.She should be ashamed&resign from her post.She is the worst Finance Minister: Kalyan Banerjee,TMC in Bankura y’day pic.twitter.com/SnUgdX55m7— ANI (@ANI) July 5, 2020
पुढे ते म्हणाले की, नरेंद्र मोदी २०१९ पूर्वी इथे आले होते. त्यांनी आश्वासन दिलं होतं की, ते देशाला एका चांगल्या स्थितीत नेतील. हो, त्यांनी त्यांचे हे वचन निभावलं असून जीडीपी घटून १ टक्का झाला आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विजय असो, असं बॅनर्जी त्यांच्या भाषणात म्हणाले. दरम्यान, या वादग्रस्त विधानानंतर बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! संशयित कोरोना रुग्णाचा मृतदेह तीन तास बस डेपोत