भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) उद्या, गुरुवारी एक नवा विक्रम रचण्यासाठी जात आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या तीन दिवसापूर्वी अवकाशात भारत एक मोठी झेप घेणार आहे. इस्रो पृथ्वीवर नजर ठेवण्यासाठी आपल्या देशातील पहिले उपग्रह ईओएस-०३ (EOS-03) प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहामुळे अवकाशातून देशावर नजर ठेवली जाणार आहे. ईओएस-०३ प्रक्षेपित करण्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित झाल्यानंतर भारताची ताकद वाढणार आहे. महत्त्वाचे हे उपग्रह म्हणजे भारतात येणाऱ्या पूर आणि चक्रीवादळांसारख्या आपत्तींवर लक्ष ठेवणार आहे.
इस्रोने ट्वीट करून ईओएस-०३ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा काउंटडाऊन सुरू झाल्याची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन- एफ १० ईओएस-०३च्या प्रक्षेपणासाठी काउंटडाऊन आज सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) शार, श्रीहरिकोटा येथून सुरू झाले आहे. उद्या, गुरुवारी (१२ ऑगस्ट) सकाळी ५.४३ मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात झेपावेल. पण याची वेळ हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असेल.
ईओएस-०३ हे एक अत्यंत विकसित उपग्रह आहे, जे जीएसएलवी एफ १० (GSLV F10) या यानाच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थपित केले जाईल. जर ही चाचणी यशस्वी झाली तर भारताची ताकद आणखी वाढेल आणि हवामानाशी संबंधित उपक्रम समजून घेणे सोपे होईल.
Countdown for the launch of GSLV-F10/EOS-03 mission commenced today at 0343 hrs (IST) from Satish Dhawan Space Centre (SDSC) SHAR, Sriharikota: Indian Space Research Organisation (ISRO) pic.twitter.com/Nu8egeffMb
— ANI (@ANI) August 10, 2021
काही खास वैशिष्ट
माहितीनुसार, ईओएस-०३ उपग्रह एका दिवसात पूर्ण देशाचे ४ ते ५ वेळा फोटो घेईल. मग हवामान आणि पर्यावरण बदलाशी संबंधित मुख्य डेटा पाठवेल. तसेच ईओएस-०३ उपग्रह भारतीय उपखंडातील पूर आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या प्रत्यक्ष वेळेवर निरीक्षण करेल.
यावर्षातले पहिले मिशन झाले होते फेब्रुवारी महिन्यात
यापूर्वी २८ फेब्रुवारीला इस्रोने यावर्षातले पहिले मिशन यशस्वीपणे पार पाडले होते. भारताचे रॉकेट २८ फेब्रुवारीला श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रापासून पहिल्यांदा ब्राझीलचा उपग्रह घेऊन अवकाशात रवाना झाले होते. ब्राझीलचे अमेजोनिया-१ आणि १८ इतर उपग्रहांना घेऊन भारताचे पीएसएलवी सी-५१ने श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून उड्डाण केले होते. या अंतराळ यानाच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र कोरले होते.