घरदेश-विदेशओडिशात भीषण मृत्यूतांडव

ओडिशात भीषण मृत्यूतांडव

Subscribe

२८८ मृत्यू; ९०० जखमी,आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या शनिवारी २८८ झाली, तर जखमींचा आकडा ९००वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंतच्या भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जात असून ओडिशातील या मृत्यूतांडवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षांमधील नेत्यांपासून ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी याबाबत दुःख व्यक्त केले.

शुक्रवारी सायंकाळपासून सुरू असलेले बचावकार्य शनिवारी दुपारपर्यंत अखेर पूर्ण करण्यात आले. बचाव पथके, एनडीआरएफसह राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध दलांच्या जवानांनी युद्धपातळीवर काम करीत बचावकार्य केले. या अपघातातील बळींची संख्या २८८पर्यंत पोहचल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून अधिकृतपणे सांगण्यात आले, तर आतापर्यंत जखमींची संख्या ९०० झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहचवण्यासाठीची सुविधा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी जाऊन भेटी देण्याचे सत्र राजकीय नेत्यांकडून सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांकडून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांमधील नेत्यांनी याप्रकरणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या अपघातात जखमी आणि मृत्यू पावलेल्या प्रवाशांसाठी शुक्रवारी रात्रीच मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. कमिशनर रेल्वे कमिटीलाही बोलावण्यात आले आहे. तेही चौकशी करतील. हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली जाईल. आता सर्व फोकस बचाव करण्यावर आहे. या अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना चांगल्या रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार केले जातील आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत त्या रुग्णांची माहिती पोहचवली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जो दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल. त्याला सोडले जाणार नाही.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -