संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा भारताची निवड करण्यात आली आहे. बिनविरोध निवडून आल्यानंतर भारत आता २०२१-२२ कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च मंडळाचा अस्थायी सदस्य असेल. १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या अधिवेशनासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य तसंच आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. भारतासह आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे या देशांचीही निवड करण्यात आली आहे.
Member States elect India to the non-permanent seat of the Security Council for the term 2021-22 with overwhelming support.
India gets 184 out of the 192 valid votes polled. pic.twitter.com/Vd43CN41cY
— India at UN, NY (@IndiaUNNewYork) June 17, 2020
भारताला १९२ पैकी १८४ मते मिळाली
या विजयानंतर, संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले की, भारत अधिक चांगली बहुपक्षीय प्रणालीचे नेतृत्व आणि पुनर्रचना करत राहील. भारताला १९२ मतांपैकी १८४ मते मिळाली. तिरुमूर्ती म्हणाले, २०२१-२२ या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली याचा मला खूप आनंद झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी भारतावर जो विश्वास दाखवला त्यासाठी आभारी आहे..
दर वर्षी ५ अस्थायी सदस्यांसाठी निवडणुका होतात
दर वर्षी, महासभा दोन वर्षांच्या मुदतीसाठी एकूण १० अस्थायी सदस्यांपैकी पाच निवडते. या १० अस्थायी जागा प्रादेशिक आधारावर वितरीत केल्या आहेत. आफ्रिका आणि आशियाई देशांसाठी पाच जागा वितरित केल्या आहेत, एक पूर्व युरोपियन देशांसाठी, दोन लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांसाठी आणि दोन पश्चिम युरोपियन आणि अन्य राज्यांसाठी आहेत. उमेदवार देशांना परिषदेवर निवडण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.