सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा आज निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी मिश्रा यांनी सरन्यायाधीश म्हणून आपले शेवटचे भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले की, “भारतीय न्यायव्यवस्था जगातील सर्वश्रेष्ठ न्यायव्यवस्था आहे. इथे लोकांच्या हक्काना सुरक्षित ठेवले जाते. अनेक संकटाचा सामना करुन देखील भारतीय न्यायव्यवस्था भक्कमपणे उभी आहे. मी लोकांचा इतिहास पाहून नाही तर त्यांचे काम आणि त्यांचा दृष्टीकोन पाहून निर्णय घेतो.” जेव्हा देशातील सर्वदूर परिसरातील व्यक्तीला न्याय मिळेल तेव्हाच Justice with Equity हे तत्त्व लागू होईल, असे प्रतिपादन दीपक मिश्रा यांनी केले.
I do not judge people by history, I judge people by their activities and their perspectives: Outgoing Chief Justice of India Dipak Misra during his farewell address in Delhi. pic.twitter.com/MSeOx7o9Cu
— ANI (@ANI) October 1, 2018
सरन्यायाधीश मिश्रा पुढे म्हणाले की, न्यायाला मानवाचा चेहरा आणि मानवी मूल्य असायला हवा. गरीब आणि श्रीमंत माणसाचे अश्रू हे सारखेच असतात. न्याय करताना दोन्ही बाजूला संतुलन राखायला हवे. माझ्यानंतर होणारे सरन्यायाधीश रंजन गोगाई हे न्यायाची स्वायत्तता आणि त्याची प्रतिष्ठा पुढे नेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे गाजलेले काही निर्णय –
– शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर शेकडो वर्षांपासून असलेली बंदी उठवली.
– व्याभिचाराबाबत स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव करणारे भादंवि मधील कलम ४९७ रद्द केले.
– नमाज पठाण करण्यासाठी मशिदीतच गेले पाहीजे, असे नाही. मशिद हा इस्लामचा अविभाज्य घटक नाही.
– आधारला घटनात्मक दर्जा आहे. मात्र बँक, शाळा, खासगी कंपन्यांना आधारसक्ती करता येणार नाही.
– समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारे भादंवि ३७७ रद्द करण्यात आले.
– एससी / एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत पदोन्नतीमध्ये असलेले आरक्षण रद्द करण्यासाठी नकार. राज्यांना निर्णय घेण्याचा दिला अधिकार
– गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुढाऱ्यांना निवडणूक बंदी न घालण्याचा निर्णय… न्यायपालिका आपली पायरी ओळखून असल्याचे प्रतिपादन