बिहारच्या नालंदा येथील एका रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून सोनम देवी नावाची महिला उपचार घेत होती. ती गेल्या कित्येक महिन्यांपासून क्षयरोगाने त्रस्त होती. आपल्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत त्यामुळे आपल्यानंतर आपल्या दोन लहान चिमुकल्यांचे काय होईल? असा प्रश्न तिला सतावत होता. प्रकृती चिंताजनक झाल्यावर तिला नालंदाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिने आपल्या दोन लहान चिमुकल्यांना विकण्याचा निर्णय घेतला होता. ती ५० हजारांमध्ये मुलांना विकू इच्छित होती. ही बाब देशभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे प्रशासन तिच्या मदतीसाठी धाऊन आले आणि तिच्या उपचाराची सर्व जबाबदारी हाती घेतली. मात्र, तरीही तिचा मृत्यू झाला.
बिहारच्या आरोग्य खात्यावर प्रश्न उपस्थित
नालंदाचे डीएम म्हणाले की, ‘नालंदामध्ये क्षयरोगाशी झुंज देणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात तिने आजारपण आणि आर्थिक विषमता यापासून त्रस्त होऊन आपल्या मुलांना विकण्याचा प्रयत्न केला होता. महिलेला वेळेवर सर्व उपचार पुरवले जात होते. मात्र, तरीही आम्ही तिला वाचवू शकले नाहीत.’ एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ही महिला ज्या रुग्णालयात दाखल झाली होती त्याचे मॅनेजर सुरजीत कुमार यांनीच तिला रुग्णालयात दाखल केले होते. या महिलेचे बालक कुपोषणाचे बळी ठरले आहेत. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सोनमच्या मृत्यू नंतर बिहारच्या आरोग्य खात्यावर खर्च केले जाणारे कोट्यावधी रुपयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा – मृत्यूशी झुंजणाऱ्या आईला ५० हजारात विकायची आहेत मुलं