राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज आपल्याच सरकारविरोधात उपोषण केलं आहे. राज्यस्थानमध्ये येत्या आठ ते नऊ महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्याच सरकारविरोधात उपोषणाला बसले आहेत. मात्र, या परिसरात लावण्यात आलेल्या बॅनवरून काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब आहेत.
सचिन पायलट यांच्या उपोषणाला पक्षश्रेष्ठींकडून विरोध होता. काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी या उपोषणाला पक्षविरोधी कृत्य असे म्हटले आहे. तरीदेखील सचिन पायलट हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याविरोधात पक्ष कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात असून त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#WATCH जयपुर: राजस्थान की पूर्व मुख्यमंत्री वसुंधरा राजे की सरकार में हुए भ्रष्टाचार के ख़िलाफ कांग्रेस नेता और राजस्थान के पूर्व उप मुख्यमंत्री सचिन पायलट ने अपना एक दिन का अनशन शुरू किया। वीडियो अनशन स्थल से है। pic.twitter.com/RnuFnP3wI3
— ANI_HindiNews (@AHindinews) April 11, 2023
काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून जयपूर येथील शहीद स्मारक येथे एका दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला सुरूवात केली आहे. आपल्याच सरकारविरोधात पायलट यांचे हे आंदोलन असल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. मात्र, परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याचे फोटो नाहीत. पायलट यांच्या उपोषणासाठी हुतात्मा स्मारकावर स्टेज उभारण्यात आला असून तिथे फक्त महात्मा गांधींचा फोटो लावण्यात आला आहे.
नेमकं उपोषणाचं कारण काय?
जयपूरमध्ये रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर मागील वसुंधरा राजे सरकारच्या काळात उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला. केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा गैरवापर करत आहे आणि आमच्या काँग्रेस नेत्यांवरही कारवाई केली जात आहे. परंतु राजस्थानमध्ये आमचे सरकार एजन्सीचा कोणताही वापर करत नाहीत. २०१८च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली होती, परंतु आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. यावरून जनता वसुंधरा राजे आणि अशोक गेहलोत यांच्यात काही मिलीभगत असल्याचे म्हणू शकतात, असं पायलट म्हणाले.
पायलट यांच्या उपोषण आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यच्या विविध भागांतून समर्थक जयपूर येथे येत आहेत. पायलट समर्थक नेते आणि आमदारांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांना जयपूरला येण्याचे आवाहन केले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना काँग्रेसच्याच प्रमुख नेत्याने सरकारविरोधात उपोषण करण्याची गेल्या दोन दशकातील ही पहिली वेळ आहे.