‘तुम्ही मोदी सरकारला काहीही विचाराल, ते मागे बघतील. त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला? ते म्हणतील पहा काँग्रेसने हे ५० वर्षांपूर्वी केले होते, असे म्हणत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी (ता. 02 जून) संध्याकाळी ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल ट्रेनला अपघात झाला. या ट्रेनने लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. त्यानंतर या ट्रेनची धडक समोरून येणाऱ्या आणखी एका ट्रेनला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामुळे 288 निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे.
हेही वाचा – Train Accident : ओडिशात 51 तासानंतर गाडी सुटली, पण लगेच दुसरा अपघात, मालगाडीचे 5 डबे घसरले
राहुल गांधी अमेरिकेतील वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यावेळी त्यांच्याकडून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. सोमवारी (ता. 05 जून) त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत, मोदी सरकारला विचारा की तुम्ही पाठ्यपुस्तकातून पीरियोडिक टेबल का काढला? ते लगेच म्हणतील की काँग्रेसने हे 60 वर्षांपूर्वी केले होते.
अमेरिकेत एका ठिकाणी भारतीयांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार लगेच उत्तर देतात की, मागे वळून पहा. आता विचार करावा लागेल. तुम्ही सर्व कारने इथे आला आहात का. कल्पना करा की कार चालवताना तुम्ही फक्त मागील आरशात पाहिले तर काय होईल? तुम्ही गाडी चालवू शकाल का? तुमचे एकामागून एक अपघात होत असतील. प्रवासी तुम्हाला विचारतील तुम्ही काय करत आहात?
तर, ही पंतप्रधान मोदींची विचारसरणी आहे. त्यांना भारताची गाडी चालवायची आहे, पण ते फक्त मागे वळून पाहतात. गाडी पुढे का सरकत नाही, पुन्हा पुन्हा का धक्के मारत आहे, याचा विचार त्यांना करता येत नाही. ही भाजप आणि संघाची विचारसरणी आहे. तुम्ही मंत्री आणि पंतप्रधान बोलताना ऐका, ते फक्त इतिहासावर बोलतात. भविष्याबद्दल कोणी बोलत नाही. ते फक्त इतिहासासाठी लोकांना जबाबदार धरत आहेत, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
‘भारतात वेगवेगळ्या विचारधारांची लढाई आहे. एक भाजपचा आणि एक काँग्रेसचा, एकीकडे नथुराम गोडसेची विचारसरणी आहे आणि दुसरीकडे महात्मा गांधींची विचारधारा पुढे नेत आहोत. त्यावेळी अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती असलेल्या ब्रिटिशांशी गांधीजींनी युद्ध केले. तुम्ही लोक गांधी, आंबेडकर, पटेल, नेहरू यांच्या पावलावर पाऊल टाकत आहात, असेही राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आले.