देशात आतापासूनच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विशेषत: उत्तर प्रदेश राज्य ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाचे लोकसभेत वजन वाढते. म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच भाजपने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उकरून काढला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार मुकुट बिहारी वर्मा यांनी म्हटले आहे की, “सुप्रीम कोर्ट आमचंच असल्यामुळे राम मंदिर होणारच”, असे म्हटले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही राम मंदिर का बांधता आले नाही? असा प्रश्न निवडणुकीच्या तोडांवर विरोधक विचारण्याची शक्यता होती, त्यामुळेच आता योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या मुकुट बिहारी वर्मा यांनी हे वक्तव्य केले असल्याची अटकळ बांधली जात आहे.
BJP has come to power on the issue of development but Ram Mandir will be constructed as it is our determination The matter is in Supreme Court and the SC is ours. The judiciary, administration, the nation as well as the Ram Temple belong to us: Mukut Bihari Verma, BJP MLA pic.twitter.com/jzrNpvreNd
— ANI UP (@ANINewsUP) September 8, 2018
भाजपचे आमदार मुकुट बिहारी वर्मा हे उत्तर प्रदेशमधील कैसरगंज या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मुकुट बिहारी वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “भाजप विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत आली आहे. मात्र तरिही राम मंदिर बनवणे ही आमची प्राथमिकता आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असले तरी सुप्रीम कोर्ट आमचेच आहे. न्यायालय, प्रशासन आणि देश याच्यासोबतच राम मंदिराचा मुद्दा सुद्धा आमच्यासोबत जोडला गेलेला आहे.”
राम मंदिरच्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे मुकुट बिहारी वर्मा हे काही पहिले लोकप्रतिनिधी नाहीत. काही दिवसांपूर्वी खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील सूचक वक्तव्य केले होते. “लोकांनी आशावादी रहावे. मंदिर कधी होणार याची तारिख भगवान रामच निश्चित करतील. जे काम व्हायचे आहे ते होणारच त्याला कुणीही टाळू शकत नाही.”, असे सांगितले होते. तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही अशाचप्रकारे वक्तव्य केले होते. “राम जन्मभूमीचा विषय कोर्टात किंवा चर्चेने सुटणार नाही तर संसदेत कायदा बनवूणच हा प्रश्न सुटेल.”