टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्यांवर विराटने अखेर मौन सोडले. रोहित आणि माझ्यात कोणतेच मतभेद नाहीत, असे स्पष्ट करत आमच्यात कोणताही बेबनाव असता तर आम्ही २०१९ विश्व चषकाच्या सेमी फायनल पर्यंत पोहोचलोच नसतो. त्यामुळे आमच्यात बेबनाव असल्याच्या सर्व बातम्या हास्यास्पद असल्याचे विराटने सांगितले. वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा धक्का सहन केलेली विराटसेना आज वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाली. त्याआधी कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. विराटच्या रोहितसोबत असलेल्या वादावरील उत्तराला यावेळी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील समर्थन केले.
या गोष्टी मीडियातूनच ऐकायला मिळाल्या
वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीला रोहितबरोबरच्या बेबनावाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, या बातम्या कुठून आल्या हे माहीत नसल्याचंही त्यांनं स्पष्ट केलं. मलासुद्धा या गोष्टी मीडियातूनच ऐकावयास मिळत आहेत. टीम इंडियात सारं काही ठिक असून टीम इंडियात खेळीमेळीचं वातावरण असल्याचं त्याने सांगितले. तसेच जर टीम इंडियात अलबेल नसतं तर आम्ही विश्व चषकाच्या सेमी फायनलपर्यंत मजल मारली नसती असंही कोहली या पत्रकार परिषदेत म्हणाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सांघिक कामगिरी महत्त्वाची असते, याकडे लक्ष वेधत टीम इंडिया आणि रोहितबाबतच्या मीडियातील सर्व बातम्या हास्यास्पद असल्याचे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले.
प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले?
या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीसोबत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीसुद्धा उपस्थित होते. त्यांनीसुद्धा टीम इंडियामध्ये खेळीमेळीचे वातावरण असल्याच्या कर्णधार कोहलीच्या वक्तव्याला दुजोरा दिला. त्यामुळे टीम इंडियामध्ये दुफळी निर्माण झाल्याच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या टीम इंडियाने ७ क्रमांकावरून पहिल्या दोन क्रमांकापर्यंत पोहोचण्याची कामगिरी केली आहे. जर आमच्यात ताणतणाव असता तर रॅकिंगमध्ये नंबर दोनपर्यंत मजल मारू शकलो नसतो.