अनेक दिवसांपासून ज्याची भीती होती, तेच अखेर घडले. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले आहे. रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानंतर युक्रेनमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच विध्वंस घटना घडल्या. मात्र रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यांमुळे आता तेथील उपस्थित परदेशी नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अद्याप मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. ज्यांना गेल्या काही दिवसांपासून एअरलिफ्ट केले जातेय. आताही केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना आवाहन केले की, युक्रेनमध्ये बरीच अनिश्चितता आहे. शांतता कायम ठेवा आणि तुम्ही तुमच्या घरात, वसतिगृहात किंवा इतर कुठेही असाल तिथे सुरक्षित राहा. याशिवाय युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने प्रवास करणाऱ्या भारतीयांनी तात्पुरता स्वरूपात सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा असंही या अॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे.
Advisory to all Indian Nationals/Students in Ukraine
as on 24.02.2022.@MEAIndia @PIB_India @DDNewslive pic.twitter.com/CprwFPoZ4o— India in Ukraine (@IndiainUkraine) February 24, 2022
कीवमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, युक्रेनमधील हवाई उड्डाण बंद झाल्यामुळे विशेष उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे भारतीय दूतावासाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी वेबसाइटवर आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये काही हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. हे टोल फ्री क्रमांक आहेत ज्याद्वारे सद्यस्थितीबद्दल अधिक माहिती मिळू शकते.
हेल्पलाइन क्रमांक
+38 0997300428
+38 0997300483
+38 0933980327
+38 0635917881
+38 0935046170
यापूर्वी युक्रेनमधील भारतीय दूतावासने नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तीन वेळा अॅडव्हायजरी जारी केला आहेत. यातून तात्कळ युक्रेन सोडून मायदेशी परतण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी एअर इंडियाच्या विशेष विमानांची भारताने मदत घेतली आहे. मात्र युक्रेनमधील सध्याच्या युद्धजन्य स्थितीमुळे हवाई उड्डाण बंद करण्यात आले आहे. या कारणास्तव एअर इंडियाने भारतातून युक्रेनच्या दिशेने निघालेले विमान माघारी फिरलं आहे.